राज्य सरकारने प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढत असलेला भव्य पुतळा आणि आणि लाईट व साउंड शो उभारण्याची घोषणा केली आहे. स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी कोथळा काढून वध केला होता. त्याचे स्मरण म्हणून दरवर्षी शिवप्रतापदीन साजरा केला जातो. शिवरायांच्या या पराक्रमाचे स्मारक म्हणून तेथे अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शिभक्तांनी तसेच काही संघटनांनी केली होती. त्या मागणी नुसार राज्य सरकारने पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. याबाबत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.
पर्यटन मंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ”शिवभक्तांच्या मागण्या लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे!”
शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे!#shivpratap #छत्रपतीशिवाजीमहाराज #प्रतापगड pic.twitter.com/SyR0v23av3
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) November 15, 2022
यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त एतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रतापगडावर शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतानाचा पुतळा तसेच लाईट आणि साऊंड शो सुरू करण्याची मागणी शिवभक्त आणि संघटनांनी केली होती, त्यांच्या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत पुतळा, लाईट आणि साऊंड शो उभारण्याची घोषणा केली आहे. नुकतेच राज्य सरकारने शिवप्रतापदिनी प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे हटविली, त्यानंतर आता गडावर अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा देखील उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
प्रतापगडावर शिवरायांनी केला होता अफजल खानाचा वध
शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्याचे तोरण बांधले, त्यानंतर ते मावळ प्रांतात स्वराज्याचा विस्तार करत होते. विजापूरी दरबार यामुळे अस्वस्थ झाला. त्यानंतर अफजल खानाला शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वराज्यावर चाल करुन पाठविले. अफजल खान स्वराज्यावर चाल करुन येत असल्याचे समजताच शिवरायांनी जावळीच्या खोऱ्यातील घनदाट अरण्याने व्यापलेल्या प्रतापगडावर आपला मुक्काम हलविला आणि खानाला आपल्या जाळ्यात ओढले, खान प्रतापगडाच्या दिशेने येऊ लागला. त्यानंतर शिवरायांनी खानाला भेटीचा खलीता धाडला. खान भेटीसाठी तयार झाला. 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेटीचा दिवस ठरला. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली. खानासाठी भव्य शामियाना देखील उभारला होता. भेटीच्यावेळी खानाने शिवरायांच्या पाठीत वार केला. त्यानंतर शिवरायांनी खानाच्या पोटात वाघनखे खुपसुन खानाचा कोथळा बाहेर काढला आणि त्याचा वध केला. या दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी 10 नोव्हेंबरला शिवप्रतापदिन साजरा केला जातो.