राज्यातील बळीराजा आस्मानी संकटामुळे आधीच अडचणीत असताना आता आणखी एक संकट त्यांच्या डोक्यावर घिरट्या घालू लागले आहे. भाजीपाल्याचे दर दरदिवशी नवनवे विक्रम रचत असताना टोमॅटोचे दर (Tomato Prices) मात्र कमालीचे घसरल्याचे पाहायला मिळत आहे. टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे सर्वसामान्य नागरिक काहीसा सुखावला असला तरी शेतकऱ्याची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. साधारण 80 रुपयांवरुन थेट 25 ते 30 रुपयांवर टोमॅटोने मजल मारली आहे. दरम्यान टोमॅटोची निर्यात सुद्धा काहीशी मंदावली असल्याने अगदी अर्ध्या दरामध्ये सध्या टोमॅटोची विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या बाजारातील भाजीपाल्याच्या दरांनी सर्वसामान्यांना अवघे वेठीस धरले आहे. आस्मानी संकटात पिसून गेलेला बळीराजा उरलल्या सुरल्या मालाला मिळणाऱ्या भावामुळे थोडा सुखावला असला तरी आता मात्र त्याचे संकट काहीसे वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजारात स्वयंपाकात महत्त्वाचा असणाऱ्या टोमॅटोची आवक यावेळी प्रचंड वाढल्याने दरात मात्र मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या गडगडलेल्या भावामुळे शेतकरी मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा…
IND vs BAN : बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यांत के एल राहुल संघाबाहेर! पाहा भारताची संभाव्य प्लेइंग 11
तब्बल 80 रुपये दरावरून थेट 25 ते 30 रुपयांवर दर कोसळले आहेत. सध्या आवक मोठी असली तरी मागणी तशी नसल्याने हे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून राज्यात टोमॅटोची आवक होत असल्याने दराच्या या घसरत्या किमतींनी शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाला होता परंतु दिवाळी नंतर तरी राहिलेल्या मालाला चांगली किंमत मिळेल अशी आशा शेतकऱ्याला होती. पण प्रत्यक्षात परिस्थिती उलट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान याबाबत नाशिक बाजारातील विक्रेत्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, 10 ते 15 दिवसांची तुलना केली तर टोमॅटोचे दर 80 रुपयांवर गेले होते. आता मात्र, हे दर 25 ते 30 रुपयांवर खाली आहे आहेत. बाजापरेठेत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली असल्यानं दर घसरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आणखी हे दर घसरणार असल्याची शक्यता सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दुसरीकडे टोमॅटोचे दर घसरल्याने सर्व सामान्यांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे, त्यामुळे येत्या भविष्यात बाजारपेठेची आवक, दर कसे राहणार आणि यामध्ये नेमकं कोणाला दिलासा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.