राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मंगळवारी (ता. 15 नोव्हेंबर) वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विदर्भातील आदिवासी समाजाला संबोधित केले. त्यानंतर संध्याकाळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून संबोधित केले. राहुल गांधी यांनी वाशिमकरांना संबोधित करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला, तर “तिरंगा श्रीनगरमध्ये नेऊन फडकवणार, मला कोणी अडवू शकत नाही,” असे देखील राहुल गांधी यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या देशभरातीलसर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण अशा वेळेस ते सत्ताधाऱ्यांवर टीका करताना देखील मागे राहताना दिसत नाही. ज्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधी यांच्यावर टीका होत आहे. राहुल गांधी यांनी वाशिमकरांना संबोधित करताना मोदी यांनी आतापर्यंत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर टीका केली. मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी लावून सर्वसामान्यांच्या पाठीचा कणा मोडला आहे, तसेच मोदींचे जे प्रकल्प आहेत ते छोट्या व्यापाऱ्यांना मारण्याचे साधन असल्याचा देखील राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली, त्यावेळी काळा पैसा संपेल असे सांगण्यात आले. परंतु नोटाबंदीमुळे लाखो माणसे बेरोजगार झाले. मोदींनी आपला भारत देश दोन ते तीन माणसांना विकला असा आरोप देखील राहुल गांधींकडून करण्यात आला.
राहुल गांधी यांच्या भारत जोडे यात्रेत राज्यभरातील अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. राज्यातील अनेक शेतकरी राहुल गांधींसोबत भारत जोडे यात्रेमध्ये चालत निघालेले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांवर अन्याय का होतोय ? तर शेतकऱ्यांची कर्ज कधीही माफ होऊ शकत नाही, असे म्हंटले आहे. शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव दिला जात नाही, ज्यामुळे शेतकरी नैराश्यग्रस्त होत आहे, असे राहुल गांधी यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
हे सुद्धा वाचा
Bharat Jodo Yatra : राज्यातील महिला मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी : जयराम रमेश
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला राज्यात पहिल्याच दिवशी प्रचंड उत्साह
राहुल गांधी यांची भारत छोडो यात्रा ही सर्वांना एकत्र आणण्याचा हेतू ठेवून तर आहेच, पण त्यासोबतच या यात्रेमधून महागाईवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी महागाई विरोधात अनेक आंदोलन केली आहेत. दरम्यान, वाशिमकरांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, यूपीएच्या काळात महागाईवर टाहो फोडणारे मोदी आज महागाईच्या मुद्द्यावरून गप्प का आहेत ? बेरोजगार आणि महागाईच्या समस्येमुळे सामान्य माणूस भरडला गेला आहे. मोदी सरकारकडून सामान्यांना घाबरवण्याचे काम केलं जात असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.
राहुल गांधी यांची कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये संपणार आहे. पण भारताचा तिरंगा मी श्रीनगरमध्ये नेऊन फडकवणार आणि मला कोणी अडवू शकत नाही, असे वक्तव्य यावेळी राहुल गांधी यांच्याकडून वाशिमकरांना संबोधित करताना करण्यात आलेले आहे. देशाला विभागण्याचे काम केल्याने तिरंग्याचा मान कमी होतो. देशात अहिंसा प्रस्थापित केल्याने तिरंग्याचा फायदा होतो. भारत अहिंसा, प्रेम आणि बांधिलकीचा देश आहे. या देशात हिंसा सहन केली जाणार नाही, असे यावेळी राहुल गांधी यांच्याकडून सांगण्यात आले.