जस्टीस उदय उमेश लळीत यांना भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 49 वे सरन्यायाधीशपदी विराजमान होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी एन. व्ही. रमणा यांच्या सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ संपणार आहे, त्यानंतर रमणा यांनी शिफारस केल्याप्रमाणे न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च पदावर नेमणूक करण्यात येणार आहे. दरम्यान जस्टीस लळीत हे मुळचे कोकणातील असल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे कोकणाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. नियमानुसार मावळत्या सरन्यायाधीशांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांच्या नावाची शिफारस करावी लागते, त्याप्रमाणे जस्टीस उदय उमेश लळीत यांची शिफारस करण्यात आली आहे.
जस्टीस उदय उमेश लळीत हे थेट वकीलीतून न्यायदानाच्या या उच्च पदापर्यंत पोहोचले आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम न करता थेट सरन्यायाधीशपदासाठी निवड होणारे लळीत हे दुसरे सरन्यायधीश ठरले आहेत. उदय लळीत यांच्याआधी देशाचे 13 वे सरन्यायाधीश एसएम सिक्री यांनी 1971 मध्ये सुद्धा अशीच थेट नेमणूक करण्यात आली होती.
जाणून घ्या न्या. उदय लळीत यांच्याविषयी..
सरन्यायधीश उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सुपुत्र आहेत. त्यांचे मुळ घर गिर्ये कोठारवाडी येथे आहे. त्यांचे आजोबा वकीली करण्याच्या निमित्ताने सोलापुरात स्थायिक झाले. उमेश लळीत यांचे वडील 1974 ते 1976 या काळात हायकोर्टात न्यायमूर्ती होते. उदय लळीत यांनी त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले असून ज्येष्ठ विधिज्ञ सोराबजी यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. सर्वोच्च न्यायालयात उदय लळीत हे स्वतंत्रपणे वकीली करत होते. उदय लळीत हे 13 ऑगस्ट 2014 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत.
जस्टीस उदय लळीत त्यांच्या सौम्य स्वभावासाठी लोकप्रिय आहेत. लळीत फार काळ सरन्यायाधीशपदी राहणार नसून त्यांचा कार्यकाळ अवघ्या 74 दिवसांचाच आहे. त्यांची सरन्यायधीशपदी वर्णी लागल्यानंतर 8 नोव्हेंबर 2022 रोजी ते निवृत्त होणार आहेत. महाराष्ट्र सध्या सत्तांतराच्या नाट्यामुळे चर्चेस आला आहे. पक्षांतर्गंत अनेक खटले सर्वोच्च न्यायालयात चालू आहेत अशा वेळी महाराष्ट्रातील व्यक्तीने सरन्यायाधीशपदी विराजमान होणे हा योगायोग मानण्यात येत आहे.