मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विकी कौशल हा स्वराज्य रक्षक संभाजी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. लुकाछुप्पी आणि मिमीसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे लक्ष्मण उतेकर हे स्वराज्य रक्षक संभाजी यांच्या जीवनावरील चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.
हा एक बिगबजेट चित्रपट असेल ज्यात युद्धाचे थरारक नाट्य दिसेल. मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजन हे स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांवरील चित्रपटाची निर्मिती करत आहेत. विकी कौशलने स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या जीवनावरील चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यास होकार दिला आहे. त्यानंतर लक्ष्मण उत्तेकर यांनी चित्रपट बनवण्याची तयारी जोमाने सुरू केली आहे. या चित्रपटाचे शीर्षक अजून निश्चित झालेले नाही. संभाजी महाराजांचे शौर्य या चित्रपटात ठळकपणे आणि उत्कंठावर्धक रितीने प्रदर्शित केले जाईल. शत्रूपुढे हार न मानता संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान इतिहासात अजरामर झाले आहे. धुरंदर, साहसी छत्रपती संभाजी महाराज यांनी आयुष्यात एकही युद्ध हरले नव्हते. त्यांचा मुत्सद्दीपणा, रणनीती आणि युद्धकौशल्याच्या खऱ्या इतिहासाची नव्या पिढीला या चित्रपटातून माहिती मिळू शकेल.
लक्ष्मण उतेकर यांनी यापूर्वी लुकाछुप्पी आणि मिमी सारख्या हलक्याफुलक्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट शक्य तितका भव्य बनवण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. गेल्या सहा महिन्यांपासून या प्रकल्पावर काम सुरु आहे. त्यासाठी उच्च दर्जाची, सर्जनशील आणि तांत्रिक प्रतिभावान टीम बांधली गेली आहे. चित्रपटाचे लेखन पूर्ण झाले आहे. उत्तेकर आणि त्यांची टीम सध्या प्री-प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे. यावर्षी जूनपर्यंत या चित्रपटांचे शूटिंग सुरू होण्याची निर्माते दिनेश विजन यांना आशा आहे.
विकी कौशल सध्या मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाचे शूट पूर्ण करत आहे, त्यानंतर तो स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक अॅक्शन ड्रामाच्या शूटिंगला सुरुवात करेल. विकी कौशल हा दुसऱ्या एका चित्रपटासाठी बोलणी करत असल्याच्या बातम्या याआधी येत होत्या. सारा अली खान सोबतचा रॉम कॉम हा त्याचा चित्रपटही लवकरच येणार आहे. हा विनोदी चित्रपट पंतप्रधानांच्या आवास योजनेतून घर मिळवण्याबाबत एका विवाहित जोडप्याची कथा आहे.