वर्धा येथे 96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन (96th Akhil Bharatiy Marathi Sahitya Sammelan) पार पडत आहे. मात्र साहित्य संमेलनामध्ये केवळ सारस्वतांचीच हजेरी दिसत असून मराठी साहित्य रसिक, श्रोत्यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवल्यामुळे पुस्तक विक्रीला मोठा फटका बसला आहे. तसेच स्टॉलधारकांना (stall holders booksellers) सोईसुविधा देखील आयोजकांनी पुरविल्या नाहीत. त्यामुळे स्टॉलधारकांमध्ये नाराजी आहे. सरकारने यावर्षी साहित्य संमेलनाला दोन कोटींचे अनुदान दिले आहे. विचार करण्याची गोष्ट म्हणजे येथे जवळपास 350 स्टॉल आहेत, प्रत्येक स्टॉलकडून आयोजकांनी 7 हजार रुपये भाडे घेतले आहे. एवढे पैसे घेऊन पुरेशा सोईसुविधा देता येत नसतील तर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याला काय अर्थ आहे? असा सवाल सर्वच प्रकाशक आता करत आहेत. (96th Akhil Bharatiy Marathi Sahitya Sammelan in no facilities for booksellers stall holders)
राज्यातील काही नामांकित प्रकाशकांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले की, आयोजकांनी स्टॉलसाठी तीन दिवसांचे 7 हजार भाडे घेतले. त्यामध्ये एका व्यक्तीची होस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करु असे सांगितले होते. मात्र अशी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही. आम्ही सध्या पदरखर्चाने येथे राहत आहोत. तसेच पाण्याची सोय नाही, पुरेशी शौचालयांची व्यवस्था नाही, जवळपास 250 ते 350 स्टॉल यथे असून सहा शौचालये आहेत. जे लोक स्टॉलवर राहत आहेत त्यांना रात्री डासांचा प्रचंड त्रास होत आहे. संध्याकाळी सात नंतर स्टॉलवर बसणे देखील अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. स्टॉलवर पंखा नाही, इतर सोई नाहीत त्यामुळे डासांचा प्रचंड त्रास होत आहे.
येथे पुस्तकविक्रीला देखील अतिशय संथ प्रतिसाद मिळत आहे. अनेकांचा खर्च देखील निघालेला नाही. साहित्य संमेलनाला लोकांची गर्दी देखील खुपच कमी आहे. स्थानिक लोक हिंदी भाषा बोलणारे जास्त आहेत. त्यामुळे पुस्तकविक्रीला अतिशय थंड प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसांचे संमलेन असून काल (शुक्रवारी) काही स्टॉलधारकांची भोवनी देखील झाली नव्हती. आज काही थोडेफार लोक दिसत आहेत. मात्र पुस्तक खरेदीच्या उद्देशाने आलेले लोक खुपच कमी आहेत. केवळ संमेलन पाहण्याच्या उद्देशाने थोडेफार लोक भेट देण्यासाठी येत आहेत.
मुख्य मंडपात देखील अतिशय तुरळक लोक दिसत आहेत. संमेलन आयोजक संमेलनाची जाहिरात करण्यात कमी पडल्यामुळे आजूबाजूच्या गावांतून देखील कमीच लोक येत आहेत. शाळा कॉलेजचे विद्यार्थी देखील पहिल्यादिवशी प्रभात फेरीसाठी आलेल्या इतकेच. आता ज्या शाळांमधील विद्यार्थी येत आहेत, त्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी असल्याचे दिसून येते. संमेलनस्थळी बहुतेक पुस्तकविक्रीचे स्टॉल हे मराठी पुस्तकांचे असल्याने हे विद्यार्थी देखील पुस्तक खरेदी करत नसल्याचे दिसून येते, असे अनेक प्रकाशकांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
काही प्रकाशकांनी 10 ते 16 स्टॉल घेतले आहेत. अक्षरश: हे लोक बसून आहेत. माझी दोन दिवसांत दीड हजार रुपयांची देखील पुस्तक विक्री झाली नसल्याचे देखील एका प्रकाशकाने सांगितले. नाशिक, जळगाव, पुणे, मुंबईतून येथे येण्याचा राहण्याचा जवळपास 15 हजार रुपये खर्च आहे. मात्र पुस्तविक्रीला अद्याप हवा तसा प्रतिसाद नाही. उद्या संमेलनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या देखील पुस्तक विक्रीची आशा राहिलेली नसल्याचे देखील काही प्रकाशक यावेळी म्हणाले.
आतापर्यंत 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने पार पडली. मात्र अनेक प्रकाशक, आणि विक्रेते देखील आवाज करत नसल्याने आयोजकांना सोयरसुतक राहिलेले नाही. प्रकाशक, विक्रेत्यांनी आवाज उठवला असता तर आयोजकांनी काहीतरी हालचाली तरी केल्या असत्या. दरवर्षी पाण्याचा, राहण्याचा अशा त्याच त्याच समस्या येत असतील तर त्याला काहीच अर्थ नाही. स्टॉल धारकांकडून जर पैसे घेतले जात असतील तर किमान स्थानिक ग्रंथालयांसाठी तरी पुस्तके खरेदी तरी करायला पाहिजे ना, अक्षरश: येथे पुस्तकविक्रेते, प्रकाशक बसून आहेत, त्यामुळे कदाचित उद्या सकाळपासूनच स्टॉलधारक परत फिरण्याची देखील शक्यता वाटत आहे, असे मराठवाड्यातीलच एका आघाडीच्या प्रकाशकाने सांगितले.