एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना राजकीय महत्त्वकांक्षेने इतके पछाडले आहे, की महाराष्ट्रातील गोरगरीब, वंचित घटकांच्या प्रशासकीय, नैतिक व कायदेशीर बाबी हाताळण्याचेही भान त्यांना राहिलेले नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी तातडीने भंडारा जिल्हयाचे पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांची उचलबांगडी केली. भाजपच्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर कारवाई केल्याच्या कारणावरून त्यांनी जाधव यांची तडकाफडकी बदली मुख्यमंत्री शिंदेंकडून केली. त्यानंतर त्या ठिकाणी नवीन पोलीस अधिक्षकांची नियुक्ती करण्याचा शहाणपणा शिंदे – फडणवीस या जोडगोळीला सुचलाच नाही. अशातच आता या भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर बलात्कार झाला आहे. त्यामुळे अख्ख्या देशात महाराष्ट्राची नाचक्की झाली आहे.
केवळ सरकारी अनावस्थेमुळे नागपूरमध्ये एक महिला मृत्यूशी झूंज देत आहे. गोंदिया जिल्ह्यातील तील सावरटोळी येथील महिलेच्या सामुहिक बलात्काराने भंडारा जिल्हा हादरून गेले आहे. सदर पीडित महिलेची अवस्था गंभीर असून तिच्यावर नागपुरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केवळ सरकारी दिरंगाईमुळे पीडित महिलेची प्रत्येक श्वासासाठी झूंज सुरू आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अजूनही फरार आहे, मात्र या संपुर्ण प्रकरणात वेळीच मदत न मिळाल्याने पीडितेची प्रकृती गंभीर झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दुबळं केल्यामुळे हे भीषण कृत्य घडल्याचे समोर आले आहे.
हे सुद्धा वाचा
Nitesh Rane : दीपक केसरकरांच्या आरोपांना भाजप उत्तर देणार, थोड्याच वेळात पत्रकार परिषद
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर – रायपूर महामार्गावर कन्हाडमोह या छोट्या गावाला लागून असणाऱ्या महामार्गालगत असह्य वेदनेने तळमळत असलेली ही महिला काही तरुणांच्या दृष्टीस पडली. त्यावेळी पोटापासून पायापर्यंत रक्ताने माखलेल्या या महिलेला तरुणांनी लगेचच नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात दाखल केले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिलेला वेळीच मदत न मिळाल्याने प्रत्येक श्वासासाठी तिची झूंज सुरू आहे. प्रशानसानाला स्थानिकांनी खबर देऊन सुद्धा त्यावर तात्काळ कारवाई न झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, तर आरोपी सुद्धा मोकाट बाहेर फिरत आहेत.
सावरटोळी येथील ही पीडित महिला पतीने वाऱ्यावर सोडल्यामुळे बहिणीसोबत राहत होती. दरम्यान एका किरकोळ वादातून या महिलेने बहिणीचे घर सोडले आणि रागाच्या भरात एकटीत माहेरी जाण्यासाठी पायी निघाली. चालत जात असताना सुरवातीला एका कारचालकाने तिला मदत करणार असे सांगून तिला विश्वासात घेतले आणि तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. कारचालकाच्या तावडीतून त्या महिलेने कशीबशी सूटका करून तेथून पळ काढला.
सोबत पैसेच नव्हते परंतु खूप वेळ चालल्यामुळे तिच्या घशाला कोरड लागली होती. दरम्यान तिला पंक्चर दुरुस्ती करणाऱ्याचे दुकान दिसले आणि ती त्या दुकानात थांबली. पण त्याने सुद्धा घरी पोहोचवण्याचे आमिष दाखवून पीडितेवर त्या दुकान चालकाने आणि त्याच्या मित्राने आळीपाळीने बलात्कार केला आणि तसेच तिला निवस्त्र रस्त्यात सोडून पळ काढला. या घटनेत पीडित महिला रात्रभर निवस्त्र रस्त्यावर वेदनेने रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत राहिली. सकाळी व्यायाम करणाऱ्या काही तरुणांचे याकडे लक्ष गेले आणि त्यांनी तातडीने रुग्णवाहिका करून पीडितेला रुग्णालयात दाखल केले आहे.
एकनाथ शिंदेंनी पोलिसांना केले दुबळे
भंडारा जिल्ह्यातील या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर अनेकांनी दुःख व्यक्त करीत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षकांचे पद रिक्त होते, त्यामुळे नेमकी दाद मागायची कुठे असा प्रश्न सुद्धा यावेळी निर्माण झाला. तत्कालीन पोलिस अधिक्षक वसंत जाधव यांनी स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तातडीचे बदलीचे आदेशच काढण्यात आले होते. जिल्ह्यात पोलिस अधिक्षक नसल्याने तेथील प्रशासनाचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे याबाबच्या तपासाला सुद्धा फटका बसला. दरम्यान पद रिक्त असल्यामुळे शासनावर टीका होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी उशीरा रात्री नागपूर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांची वसंत जाधव यांच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.