टीम लय भारी
मुंबई : आमदारांमध्ये असंतोष आहे. अपक्ष आमदार नाराज आहेत. हे सरकार जनतेचे काम करीत नाही. हे सरकार अचंबित करणारे निर्णय घेते. म्हणून आमचा पाचवा उमेदवार निवडून येणार आहे, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. विधानभवनात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘महाविकास आघाडी सरकार’ विरोधात पाढा वाचला. सरकारला दारूविषयक निर्णय घेण्यात स्वारस्य आहे. मोहाच्या फुलापासून आतापर्यंत देशी दारू बनविली जायची. पण या फुलांपासून विदेशी दारू बनविण्याचा निर्णय या सरकारने घेतल्याचे टिकास्त्र मुनगंटीवार यांनी सोडले.
राज्यसभा आम्हीच जिंकू, असा दावा त्यावेळी भाजप व महाविकास आघाडी असा दोघांकडून केला होता. पण प्रत्यक्षात भाजपने बाजी मारली. आता सुद्धा तेच होईल. कोणत्या आमदाराने कोणाला मतदान केले हे सांगणे चुकीचे आहे. तेवढा मी राजकीय निरक्षर नाही, असाही चिमटा त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता काढला.
अडीच वर्षात या सरकारने कुठलेच काम केलेले नाही. जनतेच्या हिताविरोधात हे सरकार काम करते. जनात नाराज आहे. म्हणून आमदारही नाराज आहेत, असे ते म्हणाले. बहुतांश अपक्ष आमदार त्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून आम्हाला मतदान करणार आहेत. ही लढाई जनतेच्या वतीने लढली जात आहे.
हे सुध्दा वाचा :
विधानपरिषदेवर चालणार कोणाची जादू ?