महाराष्ट्रातील राजकिय परिस्थितीत तीन महिन्यांपूर्वी मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले होते. सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह 40 आमदार बाहेर पडले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करत सरकार स्थापन केलं. त्यानंतर एकनात शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी 50 खोके अर्थात 50 कोटी रुपये घेतले असा आरोप विरोधी पक्षात असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाकडून वारंवार केला गेला. त्यानंतर आकता यापुढे आम्हांला खोके शब्दावरून हिणवल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदे गटाकडून देण्यात आला. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकिय वर्तूळात खोक्यांचा उल्लेख व्हायला सुरुवात झाली आहे. त्याला कारण ठरलंय विधानसभेचे हिवाळी अधिवेशन.
महाराष्ट्राचे यंदाचे हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे नागपूरात होणार आहे. या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात 19 डिसेंबर पासून होणार आहे. मात्र त्याआधी केल्या जाणाऱ्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक अधिवेशनापूर्वी सरकारच्या कामकाजातील फाईल्स आणि महत्त्वाची कागदपत्रे अधिवेशनाच्या ठिकाणी पाठवली जातात. त्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या महत्त्वाची कागदपत्रे असणाऱ्या फाईल्सचे मोठ्याच्या मोठे कागदी खोके सध्या नागपूरात नेण्यास सुरुवात झाली आहे. यावरून आता पुन्हा एकदा खोके सरकार हा शब्द चर्चेत आला आहे.
हे सुद्धा वाचा
आता तृतीयपंथींही पोलीस होणार; मॅटने दिले नवे आदेश
…तर भाजपचे 10 खासदारही निवडून येणार नाहीत, संजय राऊतांचे आव्हान
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात शेतकरी मेळाव्यात विरोधकांवर टीका केली होती. पन्नास खोक्यांवरुन पुन्हा शिंदे गटातील आमदारांवर त्यांनी टीका केली त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील रोखठोक उत्तर दिले होते. कंटेनरमधून फ्रिजच्या खोक्यातून पैसे कुठे गेले? याचा शोध आता आम्ही घेणार, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला होता.
दरम्यान, विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरात सुरू होणार आहे. यावेळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे राज्यात सध्या सुरू असलेल्या एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे वादामुळे राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न रखडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारण्यासाठी विरोधी पक्ष तयार असेल. त्यामुळे आता येत्या हिवाळी अधिवेशनात विरोधी गटाच्या प्रश्नांना एकनाथ शिंदे आणि सरकारमधील मंत्री कशाप्रकारे उत्तरे देतील हे पाहावे लागेल.