सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अनेकजण जिवाचा आटापिटा करतात. मिळेल ती नोकरी पदरात पाडून घेण्याचा बेरोजगारांचा प्रयत्न असतो. पण एकदा का नोकरी मिळाली की मग मलईदार पदांच्या मागे हे नोकरदार लागतात. मंत्रालयात (Mantralya) मंत्र्यांच्या कार्यालयात कामाची संधी मिळाली तर सोन्याहून पिवळे !. तळागाळात जावून काम करण्याची नोकरी मिळालेले सुद्धा मंत्रालयात संधी मिळवितात. आपली मूळ जबाबदारी द्यायची सोडून आणि वशिला लावून मंत्रालयात मोक्याची जागा पटकवायची असे अनेक महाभाग वर्षानुवर्षे करीत आले आहेत. याच मानसिकता असलेले काही जनावरांचे डॉक्टर मंत्रालयात घुसले आहेत.
महेश कुलकर्णी, चंद्रशेखर खडतरे व राजेश कवडे अशा काही जनावरांच्या डॉक्टरांची माहिती ‘लय भारी’च्या हाती आली आहे. इतरही अनेक जनावरांचे डॉक्टर ‘चोरी चोरी, छुपके छुपके’ मंत्रालयात घुसले आहेत. महेश कुलकर्णी हे तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar) यांचे खासगी सचिव आहेत. यापूर्वी ते सुनील तटकरे, एकनाथ खडसे यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून काम करीत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी डॉ. राजेश कवडे हे सुद्धा जनावरांचे डॉक्टर आहेत. महसूल, नगरविकास अशा बलदंड खात्यातील अभ्यासू व हुशार अधिकारी घेण्यासाठी शिंदे यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. असे असताना बिचाऱ्या मुक्या जनावरांवर अन्याय करून त्यांनी एका पशु वैद्यकास आपल्या कार्यालयात दाखल करून घेतले आहे.
चंद्रशेखर खडतरे हे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी आहेत. त्यांनी सुद्धा यापूर्वी विविध मंत्र्यांकडे कामे केली होती. महेश कुलकर्णी यांच्याप्रमाणे खडतरे यांनाही मंत्रालय सोडवत नाही. कुलकर्णी व खडतरे ही दोनच नावे समोर आली असली तरी असे अनेकजण मंत्रालयात कार्यरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
ऐकावे ते नवलच, नापास केले म्हणून विद्यार्थ्यांनी मास्तरांनाच धुतले
Sharad Pawar : एकनाथ शिंदेंची चूक सुधारण्यासाठी शरद पवारांची उद्या बैठक !
वास्तविक, जनावरांशी संबंधित नोकरी करीत असलेल्या या कर्मचाऱ्यांनी आपली गावोगावच्या शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करायला हवा. पशूधन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करणे, आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी प्रयत्न करणे, दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग करणे यासारख्या उपक्रमांमध्ये अशा अधिकाऱ्यांनी मनापासून सहभागी व्हायला पाहीजे. त्यासाठीच सरकार त्यांना पगार देत असते.
परंतु आपल्या मूळ जबाबदारीपासून पळ काढत हे अधिकारी मंत्रालयात मलईदार पदावर येतात. पीएस, ओएसडी अशा पदांवर आल्यानंतर मंत्र्यांच्या मागेपुढे करता येते. मंत्र्यांकडे अनेकजण कामे घेऊन येत असतात. अशा उपयुक्त कामांसाठी पीएस, ओएसडी आसुसलेले असतात. त्यामुळे जनावरे मेली तरी चालतील, पण मी माझी पोळी भाजण्याचे काम करणार अशा पद्धतीने हे महाभाग मंत्रालयात खूर्ची अडवून बसतात.
विशेष म्हणजे, जनावरांच्या खात्याशी संबंधित नसलेल्या मंत्र्यांकडेच ही मंडळी नेमकी कामे करतात. अनेकजण तर पशू व दुग्ध विकास मंत्र्यांचे पत्र घेतात. पण प्रत्यक्षात मात्र तिसऱ्याच मंत्र्यांकडे काम करतात. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ कामगिरीवर पाठविले पाहीजे, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.