सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांची ‘अभिनंदन मुलाखत’
टीम लय भारी
मुंबई : महाराष्ट्र हे देशाला दिशा दाखवणारं, मार्गदर्शन करणारं, प्रेरणा देणारं राज्य आहे. अशा राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारताना ‘लय भारी’ (Lay Bhari) वाटलं. हे पद लय भारी आहे, नक्कीच आहे. पण तसं दडपण माझ्यावर कधी आलं नाही. याचं कारण सत्ता उपभोगली नसली तरी सत्ता जवळून पाहत आलो. शिवसेनाप्रमुखांमुळे पहिल्यापासून हा अनुभव घेत आलो. साधारणतः सत्ता काय असते… हे जवळून पाहत आलो. त्यामुळे दडपण कधी आलं नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून कोरोना, कंगणा आणि इतर अनेक विषयांवर उघडपणे भाष्य केले आहे. ही मुलाखत ‘अभिनंदन मुलाखत’ नावाने प्रदर्शित करण्यात आली आहे. या प्रदीर्घ मुलाखतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच विरोधकांकडून सरकारवर करीत असलेल्या आरोपांचाही कडक समाचार घेतला. या मुलाखतीच्या माध्यमातून सुरुवातीलाच त्यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला साष्टांग दंडवत घातला.
त्यानंतर पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सगळ्यांनी पहिल्या दिवसापासून सहकार्याची भूमिका घेतली. त्यांच्याही मनात एक असं होतं की, चला आता वातावरण मोकळं झालं, चांगलं झालं. आता कामाला लागूया! हे जे काही सहकार्य करताहेत ते महत्त्वाचं आहे. संपूर्ण राज्यातली प्रशासनाची यंत्रणा आहे, पोलीस आहेत, महसूल विभाग आहे. सगळय़ांचंच सहकार्य लाभतंय म्हणून आणि म्हणून विनासायास हे एक वर्ष पार पडलं आणि मला आत्मविश्वास आहे की पुढचीसुद्धा चार वर्षे नक्कीच आम्ही पार करूच करू. पुढच्या पाच वर्षांचं जनता आहेच. ती ठरवेल.
महाराष्ट्रात अशा प्रकारे सत्ता परिवर्तन होणं हे अनपेक्षित होतं. हा खरं तर राजकीय चमत्कारच होता. त्यामुळे मी सुरुवात केली तीच मुळी मायबाप जनतेला साष्टांग दंडवत घालून. कारण त्यांचा भरभक्कम आशीर्वाद, प्रेम आणि विश्वास याशिवाय हे सारं अशक्य होतं. अशा राजकीय घडामोडी घडत असतात किंबहुना घडतात, पण त्या प्रत्येक घडामोडीच्या मागे जनता असतेच असं नाही. तुम्हाला गेल्या वर्षाचा तो दिवस आठवत असेल शपथविधीचा. तेव्हा शिवतीर्थ फुलून गेलं होतं. आनंदाने ओसंडून वाहत होतं. काही जणांना असं वाटलं की हे जनमताच्या विरुद्ध झालं. आजही तीच ओरड सुरू आहे. हे सरकार अनैसर्गिक असल्याची. पण तसं जर असतं तर शिवाजी पार्कवर, शिवतीर्थावर तेव्हा कुणी फिरकलंही नसतं. साहजिकच आहे, हे सगळं घडवणं फार कठीण होतं. आपणही त्याचे साक्षीदार आहात. एक महत्त्वाचे घटक आहात. आघाडी करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत होते तेव्हा मुळातच काही जणांना वाटत होतं की, हे तिन्ही पक्ष एकत्र येणारच नाहीत. काही जणांचा तसा कयास होता. त्यांना वाटत होतं शिवसेना आपल्या मागे फरफटतच येईल. शिवसेनेला आपल्याच मागे यावं लागेल. त्याशिवाय ती काहीच करू शकत नाही असा ज्यांचा समज होता तो आपण फोल ठरवला. यात नक्कीच काँग्रेस पक्षाची भूमिका महत्त्वाची… मग त्यात सोनियाजी आहेत. राष्ट्रवादीची भूमिकाही महत्त्वाची. मग शरद पवारजी आहेत. त्यांनीसुद्धा नाही म्हटलं तरी एक राजकीय धाडस दाखवलं आणि विश्वास दाखवला.
महापालिकेवरचा भगवा उतरणं केवळ अशक्य!
मुंबईकरांच्या विश्वासाची भक्कम तटबंदी महापालिकेच्या गडाभोवती आहे. आणि म्हणून ज्यांना लढाई करायची खुमखुमी असेल त्यांनी या तटबंदीवर डोकं आपटून बघावंच. भगवा उतरवणं सोडून द्या. आधी या तटबंदीवर डोकं आपटून बघावं. कारण माझ्या मुंबईकरांच्या प्रेमाची आणि विश्वासाची भक्कम तटबंदी या मुंबईच्या आणि महापालिकेच्या सभोवती आहे आणि तिच्यावर मुंबईकरांनी फडकवलेला भगवा… तो कुणाला जवळपासही येऊ देणार नाही, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
ईडीसारख्या संस्था… ज्या केंद्र सरकारच्या हातात आहेत. त्या संस्थांचा वापर महाविकास आघाडीच्या आमदारांवर धाडी घालून दहशतवाद आणि दडपशाही करताहेत. जेणेकरून आमदारांनी गुडघे टेकावेत. माझं या सगळ्या घडामोडींवर लक्ष आहे. मी मागेही म्हटलं होतं की मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो.
या सगळ्याचा सरकार काय, अख्खा महाराष्ट्र प्रतिकार करेल. कारण महाराष्ट्रात हा असला विचार कधीच रुजलेला नाहीच. राजकारण राजकारणासारखं करा. त्यात तुम्ही केवळ सत्तेचा दुरुपयोग करून अंगावर येणार असाल तर सत्ता सदासर्वकाळ कोणाकडे राहत नाही. मागे त्यांच्याहीबद्दल कसं सगळं चाललं होतं आणि त्याही केसेस कशा होत्या, काय होत्या हे आठवत असेलच. त्यावेळेला शिवसेनाप्रमुखांनी कसं त्यांना वाचवलं होतं याचं थोडं जरी भान त्यांना असेल, तर काळ कसा बदलू शकतो आणि याही काळामध्ये सत्ता ही केवळ खुर्चीत बसलो असलो म्हणून नाही तर जनता ही मोठी ताकद आहे आणि खरी सत्ता ती असते. ती आमच्यासोबत आहे, असे ते म्हणाले.
माझी आजही प्रामाणिक इच्छा आहे की, हे असं विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका. कारण विकृती ही विकृती असते. त्या मार्गाने जायची आमची आज तरी इच्छा नाही. आम्हाला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
आज एक वर्ष या सरकारला पूर्ण होतंय. मी प्रामाणिकपणे सांगतोय, पण खरं म्हणजे मी शासन, प्रशासन या पठडीतला नाहीय. आमचं जे घराणं आहे ते सेवाव्रती आहे. महाराष्ट्राची सेवा करणारी आजची ही आमची सहावी पिढी आहे. आदित्यची पिढी बघितली तर आणि त्या पिढीवर एक संस्कार आहेत. सरकार बिरकार ठीक आहे. आम्ही जे आहोत ते सर्वांच्या समोर आहोत. पुनः पुन्हा त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. एका आव्हानात्मक परिस्थितीत मला ही मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. प्रशासनाचा अनुभव नाही, काही नाही. महापालिका अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असल्यामुळे केवळ मुंबईचे महापौर निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदन करायला मी महापालिकेच्या सभागृहात जात होतो.
मी मुख्यमंत्रीपदाच्या कामकाजाला सुरुवात केल्यानंतर कोरोनासारखं महाभयंकर संकट आलं. गेल्या शंभर वर्षांनंतर आलेलं महाभयानक संकट होतं. त्यात माझ्या तिन्ही पक्षांच्या सहका-यांनी आणि जे सरकारचे समर्थक आहेत, मग ते बच्चू कडू आहेत. सगळेच. त्यांनी जे सहकार्य मला केलं त्यामुळेच मी काम करू शकलो. अगदी समजून उमजून आम्ही जो काही कारभार करतो आहोत. एकजिनसीपणा जो काही आलेला आहे त्यामुळे तर हे शक्य झालंय.
विशेष म्हणजे प्रशासन म्हटल्यानंतर सगळी सचिव मंडळी आली. सगळेच सचिव माझ्या परिचयाचे नव्हते. त्यातले काहीजण तर कधी मला भेटलेही नव्हते. पण त्या सगळय़ांनी पहिल्या दिवसापासून सहकार्याची भूमिका घेतली. त्यांच्याही मनात एक असं होतं की, चला आता वातावरण मोकळं झालं, चांगलं झालं. आता कामाला लागूया! हे जे काही सहकार्य करताहेत ते महत्त्वाचं आहे. संपूर्ण राज्यातली प्रशासनाची यंत्रणा आहे, पोलीस आहेत, महसूल विभाग आहे. सगळय़ांचंच सहकार्य लाभतंय म्हणून आणि म्हणून विनासायास हे एक वर्ष पार पडलं आणि मला आत्मविश्वास आहे की पुढचीसुद्धा चार वर्षे नक्कीच आम्ही पार करूच करू. पुढच्या पाच वर्षांचं जनता आहेच. ती ठरवेल.
कोरोना काळामध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाला
महाराष्ट्र हे शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत प्रगत राज्य आहे. पण कोरोना काळात दुर्दैवाने म्हणा किंवा मराठीत अगदी स्पष्ट बोलायचे तर शिक्षणाच्या आयचा घो झाला. महाराष्ट्रातील विद्यापीठे असतील, शैक्षणिक संस्था असतील. यांनी उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन देशाला आणि जगाला उत्तम दर्जाचे नागरिक निर्माण करून दिले आहेत. त्यामुळे शिक्षण सुरू ठेवण्याचा आपण आटोकाट मार्गाने प्रयत्न करत आहोत. या सगळ्या कालावधीत वर्प फ्रॉम होम हा एक प्रकार नव्याने उदयास आला. एकूण काय, माझं प्रामाणिक मत आहे, मी गेल्या मुलाखतीतही बोललो असेन की, कोरोनाने आपल्याला भूतकाळात नेलंय की भविष्यकाळात? माझं मत आहे, भविष्यकाळात नेलं आहे. याचं कारण, ज्या काही सोयीसुविधा आपण ज्यावर संशोधन झालं आणि उपलब्धता आहे त्याचा वापर उद्या घरात बसून सगळं करता येईल अशासाठीच आहे. तसं ते आहेच. आपण बरेचजण सध्या घरात बसून सगळी कामं करतोय. तसे ऑनलाइन शिक्षणाचा आपण प्रयत्न करतोय. नववी ते बारावीच्या शाळा उघडा असा निर्णय आपण घेतलाच होता. पण अनेक देशांत जिथे सर्व सुरू केलं होतं, त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांसह विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाले. मग पुन्हा बंद करावं लागलं. आणि हा जीवाशी खेळ होतोय. म्हणून मला असं वाटतं की, काल मी जे माननीय पंतप्रधानांना आवाहन केलं की संपूर्ण देशासाठी एक धोरण ठरवा. हे राज्य उघडं आहे.. ते राज्य बंद आहे.. तिकडे कोरोना वाढला म्हणून ते राज्य बंद करा.. इकडे कमी झाला म्हणून हे उघडा.. त्यापेक्षा एक काय तो नियम घालून द्या की पुढचं वर्ष आपल्याला सुरक्षित काढायचं आहे. मग शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा राज्याने आणि केंद्राने एकमेकांच्या सहकार्यानेच काहीतरी केले पाहिजे. काय तुम्ही करू शकता? टीव्ही चॅनेल्स देऊ शकता का? ऑनलाइनसाठीसुद्धा तुम्ही आम्हाला त्वरेने नेटवर्किंगच्या सुविधा देता का? आपण तर करतोच आहोत, पण दस-याच्या भाषणात मी म्हटलं होतं की, 38 हजार कोटी हे केंद्राकडे बाकी आहेत. त्याच्यानंतर एक चार-पाच हजार कोटी आले… पुन्हा त्यात भर पडली…आता पुन्हा 37-38 हजार कोटी येणे बाकी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास खुंटतो आहे..
शेतक-यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. पण शेतक-यांच्या बाबतीत मी मुद्दामहून एक गोष्ट सांगेन, आता सगळ्या गोष्टींमध्ये परिस्थिती बिकट आहे. त्या बिकट परिस्थितीतसुद्धा आपण जे काही करता येणे शक्य असेल ते करून सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न करतो आहोत. परंतु जी सुरुवात आपण केली, त्यात एका गोष्टीचं नक्कीच समाधान आहे की, ज्या शेतक-यांचे पीक कर्ज दोन लाखांपर्यंत आहे अशा साधारणतः साडेएकोणतीस लाख शेतक-यांचे कर्ज विनासायास माफ करून त्यांना कर्जमुक्त केलं. इथून सुरुवात केली आपण.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…