दसरा मेळाव्याच्या मुद्यावरून राज्यात सध्या मोठा वादंग निर्माण झाला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यावेळी आमने – सामने आल्यामुळे यावेळचा दसरा मेळावा कोण गाजवणार अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे. दरवर्षी शिवाजी पार्क येथे हा सोहळा पार पडतो याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात दसरा मेळाव्यावरून वादावादी सुरू झाली आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाची स्थापना करीत आपणच शिवसेना असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे यंदाचा दसरामेळावा एकनाथ शिंदेच गाजवणार असे सांगण्यात येत आहे, त्यावर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी “यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं” असा तिखट सवाल करीत शिंदे गटाला फैलावर घेतले आहे.
शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी दसरा मेळाव्याविषयी, शिवसेनेच्या भूमिकेविषयी सावंतांना माध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आले. यावेळी बोलताना अरविंद सावंत म्हणाले, शिवाजी पार्कचा मुद्दा उपस्थित करताना तिथे जे कारण सांगितलं गेलं की त्यांचा पहिला अर्ज होता, तसा असेल तर आमचाही पहिला अर्ज आहे. शिवसेनेतील परंपरागत मेळावा त्याच मैदानावर होत राहिला आणि म्हणून आमचा हा न्याय हक्क आहे असे म्हणून उद्धव ठाकरेच यंदा दसरा मेळावा घेणार हे त्यांनी स्पष्ट केले.
हे सुद्धा वाचा…
ST Bus Crises : ‘लालपरी’ला लागली शिंदे सरकारची नजर, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाच्या बाजूने कौल?
पुढे अरविंद सावंत म्हणाले, शिवसेनेच्या निर्मितीनंतरचा पहिला मेळावा सुद्धा शिवाजी पार्कवर झाला आणि त्यानंतर वंदनिय हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पन्नास वर्षे तिथे गर्जत राहिले. नंतरच्या काळात उद्धव ठाकरे त्या ठिकाणी आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून मार्गदर्शन करत राहिले. तो न्याय हक्क शिवसेनेचा आहे आणि इथेच वंदनिय बाळासाहेब ठाकरेंचे शक्तीस्थळ आहे. आता या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल की नुसतंच मेळावे झाले नाही तर त्यांच्या विचारांचं सोनं लुटलं गेलं. शिवसेना प्रमुख गरजले, बरसले. देशाला दिशा दिली. आव्हानं दिली, आव्हानं घेतली. आंदोलनं केली कधी यशस्वी झालो कधी पराजित झालो पण आमचा मेळावा काही थांबला नाही आणि सोनं कधी लुटणं थांबला नाही शिवसेनेचा इतिहास काय सांगतो त्याची पुन्हा एकदा आठवण सावंत यांनी यावेळी करून दिली.
परंतु येथे तर जाणीवपूर्वक अतिशय गलिच्छ पद्धतीने राजकारण सुरू आहे ते लोकांना आवडलेलं नाही. याची स्क्रीप्ट कोण लिहून देतंय, आजची त्यांची मुलाखत स्क्रीप्टेड आहे. कोणीतरी लिहून दिलेलं स्क्रिप्ट आहे, असे म्हणून अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. पुढे सावंत म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आता शिवतिर्थावरच्या मेळाव्याला त्यांनी आडकाटी निर्माण करू नये, सामोपचाराने हा प्रसंग सोडवावा आणि उत्सव आनंदात साजरा करावा असे म्हणून शिंदे गटाला त्यांनी नमते घेण्याचे आवाहन केले आहे. खरंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या संघर्षाचा पेच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात कोणाची गर्जना होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.