राज्यातील राजकारण सध्या वेगवेगळ्या कारणांनी ढवळून निघत आहे. विरोधी गटातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांना अडचणीत आणण्याचे काम सध्या सत्ताधारी भाजपने हाती घेतली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा बाॅम्ब टाकत यावेळी काॅंग्रेस नेते अस्लम शेख यांना लक्ष्य केले आहे. शेख यांनी मढ मार्वे येथे पर्यावरणाचे उल्लंघन करून स्टुडिओ बांधला आहे, यात 1000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात अस्लम शेख यांना महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाकडून नोटीस जारी करण्यात आली असून त्यांच्यावर यासंदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुद्धा अस्लम शेख यांना कारवाईचा फटका बसणार यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काॅंग्रेस नेते आणि मुंबई उपनगरचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मढ मार्वे येथील ₹1000 कोटींच्या स्टुडिओ घोटाळा प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याप्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाच्या कोस्टल झोन मॅनेजमेंट कडून शेख यांना सीआरझेडच्या नियमांचे पालन न करणे, शिवाय मॅनग्रोव्हची नासधूस केल्याप्रकरणी नोटीस जारी करण्यात आली आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत याबाबत आदेश काढून रीतसरपणे कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
असलम शेख – मढ मार्वे ₹1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळा.
महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे
मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितले
मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे @BJP4Maharashtra pic.twitter.com/1IaEXDWQfA
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 6, 2022
हे सुद्धा वाचा
एकनाथ शिंदेंनी केल्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
Blind woman :अंध महिलांनी राज्यपालांना बांधली राखी
पर्यावरण मंत्रालयाच्या या नोटिसीनंतर किरीट सोमय्या यांनी याबाबतचे पत्रक पोस्ट करून अस्लम शेख यांना धारेवर धरले आहे. पोस्टमध्ये सोमय्या लिहितात की, असलम शेख – मढ मार्वे ₹1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळा. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितले मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे असे म्हणून त्यांनी याबाबत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान या घोटाळ्याचे वादळ अनेक दिवसांपासून घोंगावत असल्याने अस्लम शेख आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. बंद दाराआड झालेल्या चर्चेत या घोटाळ्याचाच मुद्दा असल्याची शक्यता यावेळी सूत्रांकडून वर्तवण्यात आली. दरम्यान घोटाळ्यावर दिलासा मिळवण्यासाठी केलेल्या या धडपडीला फारसे यश आलेले दिसले नाही कारण अस्लम शेख यांच्यावर कारवाईची टांगती तलवार तशीच असल्याचे दिसून येत आहे.
अस्लम शेख यांनी घोटाळ्यातून बाहेर पडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असावी का अशी खलंबत आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहेत, दरम्यान याच पार्श्वभूमीवर शेख यांच्या भूमिकेवर संशय सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी काॅंग्रेसकडून चार मते फुटली होती, त्यावेळी कोणी गद्दारी केली म्हणून प्रश्न उपस्थित करण्यात येत होता, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर फुटलेल्या मतांपैकी अस्लम शेख असतील का असा संशय सुद्धा आता व्यक्त करण्यात येत आहे.