गुजरात निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून गुजरातमध्ये भाजपला लोकांनी भरभरून मतदान करत अभूतपूर्व असे यश मिळवून दिले आहे. या निकालानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा शाधत मुंबई महानगरपालिकेवर भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आणि आमचे मित्रपक्ष या आमच्या महायुतीचा झेंडा निश्चितपणे लागेल हा मला विश्वास असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मी मागे देखील सांगितले की उद्धवजींजवळ अस्त्र आहे जे ब्रह्मास्त्रापेक्षा प्रभावी आहे. ते म्हणजे ‘टोमणेअस्त्र’. टोमणे मारल्याशिवाय त्यांचे कुठले वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. एकाच गोष्टीचा आनंद आहे.
फडणवीस म्हणाले, उद्योगाचे महत्व उद्धवजींना कळायला लागले. कारण महाराष्ट्रातले उद्योग घालवणारेच ते आहेत. रिफायनरीसारखा महाराष्ट्रातला प्रोजेक्ट जो देशातला सर्वात मोठ्या गुंतवणूकीचा, रोजगाराचा होता तो उद्धवजींनी बाहेर घालवला. त्यामुळे मला असे वाटते की कधीतरी असा विजय मिळाल्यानंतर विरोधी विचाराच्या लोकांचेही तोंडभरून कौतूक करायचे असते. मात्र अजून ते त्या मानसिकतेपर्यंत पोहोचलेले दिसत नाहीत. अजूनही जे काही महाराष्ट्रात घडले त्याचा परिणाम त्यांच्या मनावर मला दिसतो आहे.
मुंबई महानगरपालिकेवर भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आणि आमचे मित्रपक्ष या आमच्या महायुतीचा झेंडा निश्चितपणे लागेल हा मला विश्वास आहे. : उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस #DevendraFadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 8, 2022
अजित पवार यांनी कर्नाटक बँकेबाबत केलेल्या विधानावरुन फडणवीस यांनी अजित पवारांवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, खरे म्हणजे अजित पवारांनी नीट माहिती घेतली असती तर त्यांनी हे वक्तव्य केले नसते. नेमके काय घडले याची नीट माहिती मी देतो. दुर्दैवाने अजित पवारच त्यावेळी मंत्री होती. 8 डिसेंबर 2021. कर्नाटक बँकेचा राज्य सरकारकडे अर्ज. 21 डिसेंबर 2021कर्नाटक बॅंकेशी करारावर स्वाक्षरी झाली. त्यावेळी कोणाचे सरकार होते? तेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक -अर्ज 21 जून 2022यांच्याशी करार. जम्मू काश्मीर बॅंक 21 जुलै 2022ला करार. 9 डिसेंबर 2021ला मविआ सरकारने बंधन बँकेला, इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेला, करुर वैश्य बँक लि,साऊथ इंडियन बँक यांना देखील अशेच खाते हॅंडल करण्याकरता परवानगी दिलेली आहे. कर्नाटक बँक असेल किंवा उत्कर्ष फायनान्स असेल आमचे सरकार येण्याआधी वर्षभर त्यांनी दिलेले आहे. आता तेच टीका करत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला तर आश्चर्यच वाटते. मी त्यांच्यावर यासाठी टीका करणार नाही की या बँकांची नावे काहीही असली तरी त्या वित्तिय संस्था आहेत. त्या रजिस्टर्ड आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र आहे. याचे नाव जरी महाराष्ट्र असले तरी ती राष्ट्रीय बँक आहे. उद्या कर्नाटकाने नाव ‘महाराष्ट्र’ आहे म्हणून यांना आम्ही खाते देणार नाही किंवा अजून कोणीतरी खाते देणार नाही, असे म्हणणे योग्य नाही. ही प्रथाही योग्य नाही. तथापी कर्नाटक बँकेला ही सगळी खाती, बिझनेस देण्याचा निर्णय आमचे सरकार येण्यापूर्वी, 1 वर्ष आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि अजित पवार अर्थमंत्री असताना देण्यात आलेले आहेत, असे फडणवीस म्हणाले.
हे सुद्धा वाचा
गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर काय म्हणाले शरद पवार, उद्धव ठाकरे?
सर्वात मोठी बातमी : संजय राऊत म्हणतात, भाजप आणि आपचे सेटिंग!
गुजरात : भाजप मोडणार सर्वाधिक जागांचा विक्रम, तर काँग्रेसचाही सर्वात कमी जागांचा विक्रम होणार!
फडणवीस म्हणाले, मी सांगू इच्छितो की मी मुख्यमंत्री राहिलो आहे, अर्थमंत्रीही आहे. वित्त विभाग या सगळ्या गोष्टी आरबीआयच्या नियमानुसार आणि निर्देशानुसार करत असतो. एखाद्याला वाटले म्हणून द्यायचे किंवा एखाद्याला वाटले म्हणून द्यायचे नाही, असा त्याचा कुठलाही अर्थ नसतो. यात काहीतरी राजकीय षडयंत्र आहे. 2 राज्यात अशांतता पसरावी म्हणून काही लोक आता कार्यरत झालेले आहेत. कारण मी स्वतः तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोललो आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातून कर्नाटकाशीही जे व्हायचे ते बोलणे झालेले आहे. दोन्ही राज्यांनी शांतता कुठेही कमी होऊ द्यायची नाही, असा निर्णय केलेला आहे. त्यानंतर काही काही ठिकाणी अशा घटना होत आहेत. या पाठीमागे काही राजकीय षडयंत्र आहे असा वास आता यायला लागला आहे, असे फडणवीस म्हणाले.