मुंबईत मराठी (Marathi) अस्मिता तशी सर्वच राजकीय पक्ष संघटनांना सोईसाठी आवश्यक वाटते. मात्र मुंबईत (Mumbai) स्थाईक झालेल्या गुजराती भाषिकांना (Gujarati) देखील आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या राजकीय पक्षांचा नेहमीच खटाटोप दिसून येतो. महाराष्ट्रातीलच दोन नेत्यांचा सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाची पत्रिका मात्र गुजराती भाषेत छापल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. एरवी मराठी भाषेचा पुळका दाखविणाऱ्या या नेत्यांना कार्यक्रमपत्रिका मात्र गुजराती भाषेच्या कशा चालतात? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात (political debate) सुरू आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार मनोज कोटक आणि माजी आमदार पराग शहा यांच्या सत्कार समारंभाच्या एका कार्यक्रमाची पत्रिका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. ही कार्यक्रम पत्रिका गुजराती भाषेत असल्यामुळे भाजपला मराठीचा पुळका केवळ तोंडी लावण्यापूरताच आहे की काय अशी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील भाजपचे नेते पक्षाच्या शिर्ष नेतृत्वाला खुश ठेवण्यासाठी त्यांचे लांगुलचालन करण्यासाठी किती खटाटोप करतात याबाबत देखील विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग गुजरातला नेले, त्यानंतर आता मुंबईवर देखील गुजराती वरवंटा फिरविण्याचे कारस्थान महाराष्ट्रातीलच भाजपचे नेते करत आहेत, अशी टीका देखील भाजपच्या नेत्यांवर होऊ लागली आहे.
घाटकोपर येथील नेव्हल डेपो परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाच्या कामांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्द्ल घाटकोपर रेसीडेन्सी फोरम तर्फे मंगळवार (दि.३) रोजी खासदार मनोज कोटक आणि माजी आमदार पराग शहा यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार समारंभ होत आहे. या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका मात्र गुजरातीमध्ये छापल्यामुळे राजकीय वर्तुळातून मोठ्याप्रमाणात टीका होऊ लागली आहे. या कार्यक्रमाला आमदार राम कदम, माजी नगरसेवक प्रवीण छेडा, माजी नगरसेवक बिंदू त्रिवेदी, आर्किटेक्ट मनोज दहिसरिया आदी उपस्थित राहणार आहे.
हे सुद्धा वाचा
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; अजित पवार यांचे खास ते देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू साथीदार!
‘मराठी तितुका मेळवावा’ मुंबईत मराठीचा डंका; वरळीत रंगणार विश्व मराठी संमेलन
सध्या मुंबई महापालिका निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्ष वाऱ्याची दिशा आजमाविण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर परभाषिक मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा देखील जोरदार प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीच्या तोंडावर विविध विकासकामांच्या उद्घाटनांचे, लोकार्पणाचे कार्यक्रम जोरदार सुरू आहेत. मुंबईत ठिकठिकाणी विविध मेळाव्यांचे देखील मोठ्याप्रमाणात आयोजन केले जात आहे. अशातच गुजराती मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गुजराती भाषिकांची भलामन करुन महाराष्ट्रातील मराठी भाषिक नेते त्यांच्या निष्ठेचे पाईक होऊ पाहत असल्याचे पाहून मराठी अस्मिता आता केवळ मराठी भाषिकांची गोड बोलून बोळवण करण्यापुरतीच शिल्लक राहिली आहे का? असा सवाल देखील या निमित्ताे केला जात आहे.