राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महानगरपालिकेतील मागील दोन वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. महापालिकेत शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षही २५ वर्ष सत्तेत होता. या काळात झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी ते का करत नाहीत? असा सवाल करत दोन वर्षांचीच काय मागील २५ वर्षांची चौकशी करण्याचे आव्हान कॉँग्रेसचे प्रदे्शाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
पटोले यावेळी म्हणाले, चौकशी करायची तर मुळापासून करायली हवी, मात्र केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी कारवाईची मागणी केली जात आहे, हे राजकीय द्वेषातून सुरु आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून जनतेत संभ्रम निर्माण करायचा व आपली राजकीय पोळी भाजायची हे भाजपाचे कारस्थान आहे.
नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाला ब्लॅकमेल करत असतो. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कसे आले हे सर्वांनी पाहिले आहे. मुंबई महापालिकेत दोन वर्षात घोटाळा झाल्याचा भाजपाला आता साक्षात्कार झाला असून फक्त दोनच वर्षांच्या कामाची चौकशी केली जाणार आहे. भाजपाला जी काही चौकशी करायची ती करू द्या पण ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत.
हे सुद्धा वाचा :
Devendra Fadnavis : माझा एक फोन आणि बच्चु कडू गुवाहाटीत; फडणविसांनी सांगितली अंदरकी बात!
Mumbai Crime : गोरेगावातील मनसे पर्यावरण सेनेच्या सचिवावर प्राणघातक हल्ला
कोरोना काळात मुंबईसह महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाची जगानेही दखल घेतली आहे मात्र भाजपाला त्यात भ्रष्टाचार दिसत आहे. भाजपाच्या राज्यात कोरोनाकाळात किती भयानक स्थिती होती हे आपण पाहिले आहे पण स्वतःच्या कारनाम्यांकडे दुर्लक्ष करायचे व विरोधकांवर आरोप करायचे हा खेळ लोकांना समजतो. मुंबईतील जनताही भाजपच्या अशा ब्लॅकमेलिंगला ओळखून आहे, असे पटोले यावेळी म्हणाले.