29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालावा : राज ठाकरे

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालावा : राज ठाकरे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावरून चांगलाच वाद पेटलेला पाहायला मिळत. मंगळवारी (ता. ६ डिसेंबर) कर्नाटक येथे महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड केल्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातुन कर्नाटक येथे जाणाऱ्या कर्नाटक सरकारच्या बसेसला काळे फासण्यात आले. याचसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहीले आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केले आहे

सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरून वातावरण तापलेले आहे. मंगळवारी कर्नाटकात कन्नडी लोकांकडून महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच कर्नाटक येथे असणाऱ्या काही मराठी भाषिक लोकांची तेथील पोलिसांकडून धरपकड करण्यात आल्याची माहीत देखील समोर आली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटलेला असतानाच महाराष्ट्रात असलेल्या राजकीय नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झालेल्या आहेत. शरद पवार यांनी तर थेट राज्य सरकारने हा वाद २४ तासांत सोडवला नाही तर स्वतः कर्नाटक येथे जाण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील सर्वच नेते या प्रश्नावरून कर्नाटक सरकारवर संतापलेले आहेत. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून पत्राच्या माध्यमातून कर्नाटक सरकारला सज्जड दम भरला आहे. “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा.” असे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.

राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर होते. त्यामुळे ते या मुद्द्यावर नेमकं काय बोलतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात म्हंटले आहे की, ‘मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा.’

तसेच ‘हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं.’ असे आवाहन राज ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून केलेले आहे.

राज ठाकरे यांनी या पत्रात पुढे लिहिले आहे की,अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं.

मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे, असे लिहीत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे सीमावादाच्या प्रश्नावरून कर्नाटक सरकारला आव्हान दिले आहे.

हे सुद्धा वाचा

सीमा वादाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात नेत्यांमध्येच वाद पेटला

पुढील 24 तासांत परिस्थितीत सुधारली नाही तर…; कर्नाटक सीमाप्रश्नावर शरद पवार आक्रमक

‘स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत?’

पुढील वर्षी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूका घेण्यात येणार आहेत. यावरूनच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादाच्या प्रश्नावरून प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हा वाद आणखीनच पेटला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने भाजपमधून चंद्रकांत पाटील आणि शिंदे गटातून शंभूराज देसाई यांना समन्वय साधण्याची जबाबदारी दिली आहे. परंतु त्यांच्याकडून हे काहीही साध्य होत नसल्याने ठाकरे गटाकडून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी