सत्तांतराच्या नाट्यानंतर राज्यात राजकारणाची सगळी समीकरणे बदलून गेली आहेत. नवं सरकार आल्यामुळे संपुर्ण राजकीय आणि प्रशासकीय अशा साऱ्यात बाबतीत कमालीचा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या धोरणांना बाजूला सारत शिंदे – फडणवीस सरकारने आपल्या परीने राज्य हाकायला सुरूवात केली आहे. ज्या व्यक्तींची केवळ चर्चा होत होती आता त्यांची सत्ता आल्यामुळे मान वाढला आहे, दबदबा वाढल्याचे चित्र काहीसे दिसू लागले आहे. याबाबत किरीट सोमय्यांचे उदाहरण अतिशय बोलके असे आहे. ज्या पोलिसांनी ठाकरे सरकार असताना सोमय्यांना पोलिसी खाक्या दाखवत रोखले होते, आज तेच पोलिस केलेल्या कारवाईचा पश्चात्ताप वाटतो अशी भावना व्यक्त करत आहेत, त्यामुळे पोलिसांच्या बदललेल्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या ठाकरे सरकार सत्तेत असताना हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी कोल्हापूरला जाण्यास निघाले. त्यावेळी सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने रवाना होणार होते, मात्र त्याच वेळी पोलिसांकडून त्यांना एक्सप्रेसमधून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. या गदारोळामुळे बराच वेळ किरीट सोमय्या CSMT स्थानकावर थांबले होते. त्यावेळी पोलिसांनी उत्तर देत तुम्ही मला कोल्हापूरच्या वेशीवर अडवू शकता, इथे मुंबईत नाही असे म्हणून सोमय्या एक्सप्रेसमध्ये बसून कोल्हापूरच्या दिशेने सुद्धा रवाना झाले. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करून त्यांच्यावर कोल्हापूर येथे जाऊन गुन्हा दाखल करण्याचे म्हटले होते.
हे सुद्धा वाचा…
Mantralaya : ‘मंत्रालया’च्या नावाने अधिकाऱ्यांची ‘वसुली’ !
Education : व्हिजेटीआयचा अजब कारभार, कनिष्ठ शिक्षकाकडे दिले संचालकपद !
Indorama Company : चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार, इंडोरामा कंपनीचा विश्वास
त्यावेळी मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्यांची अडवणूक करत त्यांना बराच वेळ खोळंबून ठेवले होते, त्यावर कोणतीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली नव्हती, मात्र आता थेट माघार घेत सोमय्या यांना दिलेल्या वागणुकीचा ते पश्चात्ताप झाल्याचे सांगत आहेत. यावेळी बोलताना पोलिस म्हणाले, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात किरीट सोमय्या यांना ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखण्यासाठी जी कारवाई करण्यात आली त्याबद्दल आम्हाला पश्चाताप वाटतो, असे म्हणत पोलिसांनी जाहीर कबुलीच दिली आहे. या कबुलीनंतर पोलिसांच्या या अचानक बललेल्या भूमिकेवर आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
नवं सरकार सत्तेत आल्यापासून अनेकांनी आपली बाजू बदलल्याचे पाहायला मिळाले, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे चित्र दिसत असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त करीत नाराजी दर्शवली आहे.