शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरव पेडणेकर यांच्याकडे मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात एसआरए प्रकल्पात घोटाळा केल्यासंबंधीचे आरोप केले आहेत. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची शुक्रवारी (ता. 28 ऑक्टोबर) दादर पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. याचप्रकरणी आज शनिवारी (ता. 29 ऑक्टोबर) सुद्धा किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा दादर पोलिसांकडून चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. पण किशोरी पेडणेकर यांनी आज चौकशीला जाण्यासाठी नकार दिला. तर किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे पुढच्या सात दिवसात सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी दिलेले आहे.
काय आहे प्रकरण ?
जून 2022 मध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही लोकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. एसआरए मध्ये घर देण्याच्या निमित्ताने किशोरी पेडणेकर यांनी काही जणांकडून पैसे देखील घेतले आहेत, असे बोलले जात आहे. याच प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील उडी घेतली. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमधील दोघांकडून किशोरी पेडणेकर यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
जून महिन्यात ज्या नऊ जणांनी आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार केली. त्यातील दोघांनी यातील काही पैसे हे किशोरी पेडणेकर यांना दिले गेले असल्याचे सांगितले. याचमुळे शुक्रवारी किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांनी चौकशी केली.
हे सुद्धा वाचा
एकनाथ शिंदे माझे मित्र…!, तर उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले बच्चू कडू?
NCP Jayant Patil : मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचे जयंत पाटील यांनी सांगितले कारण
दरम्यान, न्यायव्यवस्थेवर दबाव आणून मला जाणीवपूर्वक अडकवलं जात असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्याकडून करण्यात आला आहे. गोमाता नगर येथे 2017 साली अर्ज भरण्यात आल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांच्याकडून देण्यात आली. तसेच याठिकाणी एकही व्यक्ती जर का माझे याठिकाणी घर आहे असे बोलला तर सरळ कुलुप लावा, असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
एका सामान्य महिलेला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचे किशोरी पेडणेकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असला तरी न्यायव्यवस्थेवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे. तसेच, पोलीस प्रशासनावरही पूर्ण विश्वास आहे. मात्र, निव्वळ राजकारणासाठी खोटी माहिती देऊन विरोधकांना जेरीस आणण्याचे प्रयत्न थांबले पाहिजेत.