टीम लय भारी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (दि. १३ जुलै २०२२) पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. पण आता ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज ठाकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे. राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सदर बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
या बैठकीत राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार होते. तसेच ते पक्षाच्या कामाबाबतीत चर्चा करणार होते. पण मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. म्हणून ही बैठक काही दिवसानंतर घेण्यात येणार आहे. ही बैठक पुन्हा कधी घेण्यात येईल याबाबत लवकरच कळवण्यात येईल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. या पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. बहुतेक जिल्ह्यात पूर आला आहे. त्यामुळे शक्य होईल, तिथे मनसैनिकांनी मदत पोहोचवावी. सांगली-कोल्हापूरच्या पुराबाबत सर्वांनाच माहिती आहे. या आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणा प्रचंड कामात असतात. त्यामुळे कोणाला काहीही त्रास न होता, मदत कार्य करावे, असेही राज ठाकरेंनी या पत्रामार्फत मनसैनिकांना आवाहन केले आहे.
दरम्यान, ‘अर्थात असं काही होऊ नये, कुठलंही संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेचा सांगितलं.’ असे राज ठाकरेंनी पत्राच्या शेवटी नमुद केले आहे.
हे सुद्धा वाचा :
शिंदे गटात गेलेल्या बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी सुरूच
नगरपालिकांच्या निवडणुकांना ग्रहण; निवडणुका पुढे ढकलण्यासाठी भाजपचा पुढाकार