टीम लय भारी
मुंबई : राज्यातील सत्तानाट्यावर अखेर १५ दिवसांनी पडदा पडला. भाजपच्या पाठिंब्याने बंडखोरी केलेल्या आमदारांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांना विराजमान केले. त्यामुळे इतके दिवस शांत असलेले हे आमदार आता मात्र बोलू लागले आहेत. सत्तेत असताना शिवसेना पक्षाच्या काही नेत्यांकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नेहमीच शिवसेनेच्या आमदारांची गळचेपी करण्यात आली, असेही त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
शिवसेना पक्षाचे बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्याविषयी खालच्या भाषेत बोलत त्यांच्यावर आरोप केले आहेत. ‘संजय राऊत हेच राष्ट्रवादीची सुपारी घेऊन संपूर्ण शिवसेना संपवायला निघाले होते,’ असा खळबजनक आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे आता संजय राऊत त्यांच्या या वक्तव्यावर नेमके काय उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण संजय राऊत हे त्यांच्याविरोधात बोलणाऱ्याला कायमच उत्तर देत असतात.
याव्यतिरिक्त, संजय गायकवाडांनी आपल्या बोलण्यावरील ताबा सोडत संजय राऊतांवर खालच्या शब्दात टीका देखील केली आहे. ‘संजय राऊत बारा बापाचा नसेल तर राजीनामा दे’ असे खालच्या भाषेतील शब्द वापरत संजय गायकवाडांनी संजय राऊत यांना पक्ष सोडण्याचे आव्हान दिले आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाणावर संजय गायकवाड यांनी आपला दावा केला आहे. ‘शिवसेनेचं धनुष्यबाण लवकरच आम्हाला मिळणार असून येत्या दोन ते तीन महिन्यांत सगळं चित्र स्पष्ट होईल,’ असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा :
ही एक ‘सस्पेन्स‘ फिल्म आहे -उपमुख्यमंत्री