युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या बुधवारी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार असून दोन्ही नेत्यांची भेट देशातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या आमदार मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे उद्या बिहार दौऱ्यावर जाणार असून त्यांच्यासोबत खासदार अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी, तसेच अन्य काही शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी देखील असणार आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर आदित्य ठाकरे सध्या पक्षसंघटनेच्या कार्यात सक्रीय झाले आहेत, मुंबईसह राज्यभरात त्यांनी सभा घेतल्या, निष्ठा मेळाव्या नंतर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पाहणी दौरा, देखील केला, मुंबईत देखील त्यांनी अनेक सभा घेतल्या. आदित्य ठाकरे यांनी राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देखील नुकतीच भेट देत भारत जोडो यात्रेचे समर्थन केले. त्यामुळे राहूल गांधी यांच्या भेटीनंतर आता ते बिहारला तेजस्वी यादव यांची देखील भेट घेत आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी ट्विट केले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, ”तरूणांच्या गळ्यातील ताईत असलेले आदित्य ठाकरे व तेजस्वी यांची ही भेट भविष्यात देशातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल. हे दोन्ही नेते अभ्यासू, हुशार, मेहनती व दूरदृष्टी असलेले आहेत. अशा तरूण नेत्यांनी एकत्र येवून देशाला दिशा देण्याची गरज आहे. त्याची ही सुरूवात.
तरूणांच्या गळ्यातील ताईत असलेले श्री. आदित्य ठाकरे व श्री. तेजस्वी यांची ही भेट भविष्यात देशातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल. हे दोन्ही नेते अभ्यासू, हुशार, मेहनती व दूरदृष्टी असलेले आहेत. अशा तरूण नेत्यांनी एकत्र येवून देशाला दिशा देण्याची गरज आहे. त्याची ही सुरूवात. pic.twitter.com/EVEJZJ8QmA
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) November 22, 2022
मनिषा कायंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये तरुण नेत्यांनी एकत्र येवून देशाला दिशा देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधी पक्षातील तरुण नेतृत्व एकत्र येवून भाजपविरोधी आघाडी करण्याची शक्यता देखील आहे. आदित्य ठाकरे यांचे राज्यातील झंझावाती दौरे, पक्षसंघटना मजबूतीसाठी त्यांचे प्रयत्न आणि विविध पक्षातील नेत्यांसोबत असलेला त्यांचा संवाद पाहता आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी एकजूट करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हे सुद्धा वाचा :
IAS Chandrakant Dalvi: चंद्रकांत दळवी यांची महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड
Bhagatsingh Koshyari : ‘भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा आदर केला आहे’
ठाकरेंचे आणखी तीन खासदार, आठ आमदार शिंदे गटात येणार!; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा दावा
नुकतीच महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा झाली या यात्रेत त्यांनी राहूल गांधी यांच्यासोबत पदयात्रा देखील केली, त्यामुळे आगामी काळात शिवसेना कॉँग्रेसचे संबंध देखील सलोख्याचे राहतील अशी देखील चर्चा आहे. तसेच आता बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भेटीमुळे देशपातळीवर देखील त्यांचे शिवसेनेचे मित्रपक्ष वाढविण्याचे धोरण असल्याचे चित्र दिसून येत आहे.