32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
HomeमुंबईMumbai News : गोवंडी परिसरात गोवरचा उद्रेक; 48 तासांत तीन बालकांचा मृत्यू

Mumbai News : गोवंडी परिसरात गोवरचा उद्रेक; 48 तासांत तीन बालकांचा मृत्यू

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात गोवरची साथ पसरली आहे. गोवरच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर साथीच्या आजरांची साथ सुरु झाली आहे. डोळे येणे, थंडी ताप येणे याचे अनेक रुग्ण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल होत आहेत. अशातच आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात गोवरची साथ पसरली आहे. गोवरच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. गोवंडीतील रफी नगरमध्ये 48 तासांत तीन बालकांचा गोवरच्या आजारामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या विभागात बीएमसीनेच संसर्गजन्य आजार पसरल्याची पुष्टी केली आहे. यानंतर बीएमसीने संपूर्ण परिसरात लसीकरण सुरू केले आहे. या आजारामुळे मरण पावलेली तिन्ही मुले एकाच कुटुंबातील होती. त्यांचे वय 2 वर्षे, 4 वर्षे आणि 6 वर्षे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, रफी नगरमध्ये 14 ऑक्टोबर रोजी गोवरचा एक संशयित रुग्ण आढळून आला होता आणि आतापर्यंत तेथे या आजाराची सहा प्रकरणे समोर आली आहे. मंगळवारी, बीएमसीने 914 घरांचे सर्वेक्षण केले आणि 4,086 लोकांची तपासणी केली. त्यापैकी 13 संशयितांना ताप आणि पुरळ असल्याचे आढळून आले. या घटनेनंतर, आम्ही सर्व स्थानिक डॉक्टरांना आणि खाजगी रुग्णालयांना त्यांच्या संबंधित आरोग्य अधिकार्‍यांना गोवरच्या प्रकरणांची तक्रार करण्यासाठी पत्र लिहिले आहे, अशी माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Skin Care Tips : त्वचा चिरतरुण ठेवण्यासाठी सोपे उपाय! आजच जाणून घ्या…

Cancer Treatment : कर्करोगाची लक्षणे समजून घ्या, अन्यथा…

Covid News : ऑस्ट्रेलियाच्या दोन तृतीयांश लोकसंख्येला कोविडचा फटका! भारतातही धोका कायम

अधिकाऱ्याने सांगितले की, तीन मुलांचा जीव गेल्यानंतर याबाबतची कोणतीही नोंद केली गेलेली नाही. या प्रकरणाचा तपास करणार्‍या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुले आजारी पडल्यानंतर त्यांना स्थानिक क्लिनिकमध्ये नेण्यात आले होते परंतु डॉक्टरांना हा आजार ओळखता आला नाही आणि आम्हाला याबाबत स्थानिक डॉक्टरांकडून कळविण्यात आले नाही. अन्यथा आम्ही कुटुंबापर्यंत पोहोचलो असतो.

कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, केवळ एम ईस्ट वॉर्डातच नाही तर इतर काही वॉर्डातही त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. आम्ही या आजारावरील लक्षणांवर लक्ष ठेवून आहोत आणि प्रभाग अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. गेल्या महिन्यात धारावीतही गोवरचा प्रादुर्भाव आढळून आला होता. येथेही काही प्रकरणे होती. धारावीशिवाय शहरभरात सुमारे 12 ते 15 ठिकाणी त्याचा प्रसार होण्याची भीती आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी