मुंबईवर पुन्हा एकदा संकटाचे सावट घिरट्या घालू लागले आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये आज पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरातील हाजीअली दर्ग्यावर हा हल्ला करणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे त्या परिसरातील सुरक्षितता मुंबई पोलिसांनी कमालीची वाढवली असल्याचे पाहायला मिळत आहे. सदर फोन टॅप केला असता उल्हासनगर येथून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या धमक्या वारंवार मुंबई पोलिस कंट्रोल रुमला मिळत असल्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस कंट्रोल रुमला आज पुन्हा एक धमकीचा फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने शहरातील प्रसिद्ध हाजीअलीवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकीच दिली. सदर फोन आल्यानंतर ताडदेव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तिथे सुरक्षा व्यवस्था वाढवली. दरम्यान, बीडीडीएस, कॉन्वेंट व्हॅनला सुद्धा पाचारण करण्यात आले, हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा संपुर्ण परिसर, एल अँड टीच्या प्रोजेक्ट साइटची सुद्धा पोलिसांनी कसून तपासणी केली परंतु हाती काहीच लागले नाही.
धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्या नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधीत नंबर बंद आला. दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा फोन नेमका कुठून आला, कोणी केला, कोणत्या उद्देशापोटी हा फोन करण्यात आला या सगळ्याच अनुषंघाने पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. यादरम्यान सदर फोन उल्हासनगर येथून डायल केल्याचे समोर आले आहे, त्यामुळे तपासाची चक्र आणखी वेगाने फिरू लागली आहे.
हे सुद्धा वाचा…
Maharashtra News : शिंदे सरकारच्या काळात निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचे फावले; पुन्हा सेवेत रुजू
Mumbai News : सीताराम कुंटे अन् इक्बाल चहल यांना न्यायालयाचे समन्स; कोरोना लसीकरणात भेदभावाचा आरोप
CM Office Schedule : दुपारी दोन पर्यंत मुख्यमंत्री ‘दारबंद!’ गर्दीवरील नियंत्रणासाठी सरकारचा निर्णय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण असून तिच्यावर उपचार सुरु आहेत आणि सदर धमकीचा फोन काल (3 नोव्हेंबर 2022) रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईच्या सुरक्षिततेला धोका निर्माण पोहोचवणारे कृत्य वारंवार समोर येत असल्याने यावर आतातरी राज्य सरकार, मुंबई पोलीस पाऊल उचलणार का हे पाहणेच महत्त्वाचे ठरणार आहे.