विद्यापीठांच्या निकालांचा गदारोळ दरवर्षीच पाहायला मिळतो. या निकालांच्या तांत्रिक दोषामुळे किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थी दरवेळी भरडले जातात, त्यांना पुढच्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यंदा सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या (इंजिनियरींग) पदवी परीक्षेच्या निकालाची यादी जाहीर झाली परंतु काही तांत्रिक दोषामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची नावे सदर यादीतून वगळण्यात आली. नावे वगळण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठात चौकशी केली मात्र त्यावेळी तांत्रिक चुकीमुळे असे झाले असल्याचे कबूली विद्यापीठाकडून देण्यात आली. विद्यापीठाच्या या अनागोंदी कारभारामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र जीव टांगणीला लागला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या (इंजिनियरींग) पदवी परीक्षेच्या निकालाची यादी मंगळवार दि.09 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली, मात्र या निकालात काही तांत्रिक दोषामुळे खूप विद्यार्थांची नावे सदर यादीतून वगळण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. यादीत नाव न आल्यामुळे निकालाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची कमालीची नाराजी झाली. यावेळी विद्यार्थ्यांकडून विद्यापीठात चौकशी करण्यात आली त्यावेळी तांत्रिक चुकीमुळे असे झाले आहे, येत्या 10 ते 12 दिवसांत सुधारित यादी प्रसिद्ध केली जाईल असे विद्यापीठाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
हे सुद्धा वाचा
Jalna IT Raid : आयकर विभागाने जालन्यातून कारखानदारांकडून जप्त केले कोटी रुपयांचे घबाड
Azadi ka Amrit Mahotsav : आरटीओकडून अनोखी ‘तिरंगा रॅली’
Amol Mitkari : रवी राणा यांना नव्याने ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज, अमोल मिटकरींचा टोला
अभियांत्रिकी पदवी परीक्षा 17 मे 2022 ते मे 30 मे 2022 या कालावधीत पार पडली. कलम 89 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या प्रत्येक परीक्षेचा व मूल्यमापनाचा निकाल 30 दिवसांच्या आत किंवा अगदीच उशीरा 45 दिवसाच्या आत निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे, परंतु असे असून देखील नियमाप्रमाणे 70 दिवस उलटून देखील विद्यार्थ्यांचे निकाल हाती मिळाले नाही. त्यानंतर विद्यापीठाकडून संबंधित निकाल जाहीर करण्यात आले परंतु त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे यादीत नाव नसल्याचे विद्यापीठाच्या नियमांचा सावळा गोंधळ पुन्हा समोर आला.
दरम्यान उशीरा निकाल लागल्याने परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला असतानाच यादीतच नाव न आल्याने विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत, काहीजण वर्ष वाया जाऊ शकते अशी भिती व्यक्त करू लागले आहेत. मागील दोन वर्ष कोविड काळात सर्व पदवी व पदवीतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्याने परीक्षा भवनाकडून वेळेत निकाल लावण्यात आले, त्यावेळी विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन विभागाने आपली पाठ थोपटून घेतली.
आता कोरोना संकटानंतर ऑफलाईन परीक्षांचे सत्र सुरू झाले असून विद्यापीठाचा आता चांगलाच कस लागत आहे. या चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सर्व पदवी व पदवीतर परीक्षा लेखी स्वरूपात झाल्यामुळे निकाल लावण्यासाठी विद्यापीठाला उशीर झाल्याचे दिसून आले. तथापी, विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराची राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष एडवोकेट अमोल मातेले यांनी दखल घेतली असून सुधारित यादी लवकरात लवकर लावण्यात यावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल मिळवण्यासाठी आंदोलन करू असा इशाराच मातेले यांच्याकडून देण्यात आला आहे.