टीम लय भारी
मुंबई : मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. राज्यात गेल्या ४ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यात पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. दरम्यान आता मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईच्या समुद्र किनारी जाण्यावर देखील मनपा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईतील फोर्ट, रे रोड, शिवडी या भागात सकाळ पासूनच पावसाने धुमाकूळ घातला आहे. यावेळी सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. परंतु मुंबईत हवामान खात्याकडून रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने मुसळधार पावसात बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन केले आहे.
पाऊस सुरु झाल्यापासून एकूण १० जणांचा समुद्रात बुडून मुत्यू झाल्याने महापालिका प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. सकाळच्या वेळी अतिउत्साही मुंबईकरांनी समुद्र किनारी जाणे टाळावे, असेही मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले. दरम्यान, आता मुंबईत जोरदार पावसामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, म्हणून मुंबई महानगर पालिकेकडून सुद्धा खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबईच्या लोकलवर या पावसाचा अद्याप परिणाम झाला नसला तरी, मुंबईतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी मात्र होत आहे.
हे सुद्धा वाचा :
एसी लोकलचा प्रवाशांना दणका; स्टेशन आले तरी दरवाजे उघडलेच नाहीत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र