‘सार्वजनिक बांधकाम खात्या’अंतर्गत (PWD) वरळी विभागामध्ये बोगस कामे झालेली नाहीत. सरकारने मंजूर केलेली सगळी कामे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी इमाने इतबारे पार पाडली आहेत, असे स्पष्टीकरण उप अभियंता सतिश आंबवडे यांनी दिले आहे. ४७ कोटी रुपयांची बोगस कामे केल्याचा अपप्रचार गैरसमजूतीतून केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नाही, असे आंबवडे यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले. यावेळी आंबवडे यांनी ‘लय भारी’च्या प्रतिनिधीला काही कामे प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन दाखविली.
वरळी, नायगाव, डिलाईल रोड व शिवडी या ठिकाणी एकूण २०७ बीडीडी (BDD) इमारती आहेत. या इमारतींमध्ये १७ हजार खोल्या आहेत. या इमारती व परिसरातील देखभाल व दुरूस्तीचे काम आम्ही सांभाळतो. रहिवाशी, स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार व सरकारने मंजूर केलेली सर्वच्या सर्व कामे आम्ही केली आहेत.
स्वतः रहिवाशी व लोकप्रतिनिधींच्या देखरेखीखाली ही कामे झालेली आहेत. शौचालये, लादीकरण, गटार दुरूस्ती, प्लास्टर व रंगकाम अशी सगळी कामे पार पाडलेली आहेत. कोणत्याच कामात गैरप्रकार झालेला नाही, असे आंबवडे यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा
बोम्मई यांच्या ट्विटबाबत अमित शहांना पत्र लिहिणार फडणवीस
टीईटी घोटाळ्यात मंत्री, अधिकाऱ्यांच्या मुलांची नावे असल्याने कारवाईला उशीर; अजित पवार यांचा आरोप
बीडीडी चाळीत सामान्य कुटुंबे राहतात. शौचालयापासून ते प्लास्टर ढासळण्यापर्यंत अनेक अडचणी अचानक उद्भवत असतात. मानवतेच्या दृष्टीने आम्ही नेहमीच रहिवाशींची अशी कामे तातडीने करून देत असतो. चांगली कामे केल्यानंतरही आमच्यावर चुकीचे आरोप झाले तर मनाला वेदना होतात, अशीही भावना आंबवडे यांनी व्यक्त केली.