टीम लय भारी
मुंबई : शहरात काही ठिकाणी पावसाचा जोर आजही कायम आहे. हवामान खात्याने संपुर्ण मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालकांनी परिपत्रक काढले असून आपापकालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत आदेश दिले आहेत.
मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने काही परिसर जलमय झाले आहेत, यामुळे शाळकरी मुलांची शाळेत जाण्यासाठी चांगलीच त्रेधातीरपीट उडत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.
परिपत्रकात असे म्हटले आहे की, “मुंबई विभागात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबईत ऑरेंज अलर्ट तर पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. सदर परिस्थिती विचारात घेता आपत्तीच्या पूर्वसुचनेनुसार, हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा व त्या अनुषंघाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील, स्थानिक क्षेत्रातील शाळांना आज, गुरूवार दि. 14 जुलै 2022 रोजी समक्ष प्राधिकारी यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.”
दरम्यान, ठाण्यातील अतिवृष्टीचा अलर्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील इयत्ता बारावीपर्यंतच्या शाळांना गुरुवार आणि शुक्रवार अशी दोन दिवसांची सुट्टी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जाहीर केली आहे.
हे सुद्धा वाचा…
प्रचारासाठी ‘शरद पवार‘ मैदानात उतरणार
ब्रेकिंग! ‘या’ दिवसांमध्ये बुस्टर डोस मिळणार मोफत; केंद्र सरकारचे मोठे पाऊल
VIDEO : बीएमसीच्या कोट्यावधी रुपयांच्या कामाची पावसाने दिली पोचपावती