महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या वतीने आज कौशल्य विद्यापीठाचा शैक्षणिक शुभारंभ कौशल्य विद्यापीठाचा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविण्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, नोबल पारितोषिक विजेते प्रो. रिचर्ड रॉबर्ट्स, MSSU च्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कौशल्य विभागाचे आयुक्त रामास्वामी, तसेच अनेक उद्योजक आणि MSSU चे सर्व पार्टनर्स उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या (MSSU) बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी राज्यपाल कोश्यारी यांनी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या कौशल्य मंत्रालयाचे कौतुक केले.
आपण सर्व भारतीय आहोत व आपण सर्व विश्वासावर चालतो. पण विश्वासाबरोबर स्किल पॉवर व विल पॉवर सुद्धा तितकीच आवश्यक आहे. तरच देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. हेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरुवातीपासूनचे व्हिजन आहे. हाच दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यावर एका वर्षातच आपल्या देशात कौशल्य मंत्रालयाची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः योगपुरुष आहेत. त्यांचा योगाचा चांगला अभ्यास आहे. कामामध्ये कौशल्य असणे हे सुद्धा एक प्रकारचे योगच आहे. म्हणूनच जो विचार कुणीही केला नाही, तो विचार पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केला म्हणूनच त्यांनी एका वर्षात कौशल्य मंत्रालय सुरु केले, असे मत यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले.
देशातील तरुणांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी कौशल्य विद्यापीठाचे शिक्षण सुरु करणे हे खूप मोठे व मोलाचे पाऊल उचल्याण्यात आले आहे. देशाच्या नव्या पिढीला जर आत्मनिर्भर बनवायचे असेल तर त्यांच्यामध्ये कौशल्य विकास करण्याची नितांत आवश्यकता आहे व त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने (MSSU) ने उचललेले हे पाऊल काळाची गरज आहे, असे विधान याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
तसेच महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविण्यता मंत्री मंगलप्रभात लोढा याबाबतची माहिती देताना म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांची परवानगी घेऊन महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे भूमिपूजन येत्या ६० दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. तर 2024 पर्यंत विद्यापीठ तयार होऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु होतील. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामध्ये इंग्रजी बरोबरच मराठी व हिंदीमध्ये सुद्धा कोर्सेस सुरु करण्यात यावेत, अशी विनंती करण्यात येणार असल्याचे देखील मंगलप्रभात लोढा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यावेळेस म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ शाश्वत मनुष्यबळ निर्मिती करीता काम करेल, शाश्वत मनुष्यबळ तयार करेल. तसेच त्यांच्यासाठी आवश्यक त्या संधी निर्माण करून, ज्यांना उद्योजक बनण्याची इच्छा असेल त्यांना उद्योजक बनण्याची संधी प्रदान करेल. असे करत असताना, पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि पीएचडी स्तरांसाठी अभ्यासक्रम आणि कार्यक्रम प्रदान करण्यासाठी प्रमाणपत्र, डिप्लोमा, ऍडव्हान्स डिप्लोमाच्या एकाधिक प्रवेश निर्गमन निकषांनुसार स्वतःला संरेखित करण्यासाठी विद्यापीठ जगातील सर्वोत्कृष्ट बेंचमार्क करेल, जे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट पदवीपर्यंत पोहचेल. त्यादृष्टीने विद्यापीठाने खालील कौशल्य शाळा स्थापन केल्या आहेत, ज्या अंतर्गत आगामी वर्षांमध्ये विविध अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.
हे सुद्धा वाचा
Kiran Lohar ACB Raid : डिसले गुरुजींवर आरोप करणारे शिक्षणाधिकारी किरण लोहार एसीबीच्या जाळ्यात
UPI Payment Charges : आता ऑनलाईन पेमेंटवरही अधिकचे पैसे द्यावे लागणार? वाचा सविस्तर
यामध्ये विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्य विज्ञान, आंतरविद्याशाखीय आणि मिडिया व कम्युनिकेशन या कौशल्य विभागांचा समावेश आहे. तसेच चालू शैक्षणिक वर्षात विद्यापीठ आपल्या अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि व्यवसाय आणि वाणिज्य स्कुल अंतर्गत शैक्षणिक कार्यक्रम सुरु करणार आहे.
या शैक्षणिक वर्षासाठी या दोन शाळांअंतर्गत सायबर सिक्युरिटी, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डेव्ह ऑप्स, इंडस्ट्री 4.0- आयओटी, एआय-डेटा सायन्स आणि बीबीए एन रिटेल मॅनेजमेंट व इनोव्हेशन आणि न्यू व्हेंचरमधील एमबीए हे एम.टेक प्रोग्राम्स व व्यवस्थापन या शैक्षणिक वर्षासाठी दिले जातील. मागील 60 दिवसांमध्ये विद्यापीठाशी अनेक कॉर्पोरेट कंपन्या पार्टनर म्हणून जोडल्या गेल्या आहेत.
तसेच येत्या चार वर्षात 10 हजार महिला उद्योजक घडविण्याचे आणि दोन लाखापेक्षा जास्त कुशल रोजगारक्षम युवक तयार करण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच येत्या जून पर्यंत मुंबईसहित ठाणे, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि नाशिक या शहरांमध्ये विद्यापीठाची केंद्रे लवकरच सुरु करण्यात येणार आहे.