टीम लय भारी
मुंबई : शहरात लोकल प्रमाणेच टॅक्सी आणि ऑटोमधून प्रवास करणाऱ्यांची सुद्धा संख्या मोठी आहे, इच्छित स्थळी वेळेत पोहवणाऱ्या या वाहनांचा पर्याय प्रवाशांचा नेहमीच प्रवास सुखकर ठरतो, परंतु लवकरच प्रवाशांची आता अडचण वाढणार आहे. टॅक्सीच्या मोठ्या युनियनने 1 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. सरकार भाडेवाढीबाबत दुर्लक्ष करीत असून याबाबच्या निर्णयाला दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ टॅक्सी युनियने हा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टॅक्सी युनियन कडून सध्याच्या दरात 10 रुपये वाढ करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सध्याचे दर 25 रुपये आहेत, यामध्ये 10 रुपये वाढवून भाडे 35 रुपये करावे अशी मागणी या युनियनने केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने सादर केलेल्या अहवालानुसार टॅक्सी युनियन प्रमाणे ऑटो चालक सुद्धा संप करण्याच्या तयारीत आहेत. 31 जुलै पर्यंत सरकारच्या भाडेवाढीची ते प्रतिक्षा करतील परंतु तोपर्यंत कोणताच प्रतिसाद न मिळाल्यास रिक्षा चालकसुद्धा संप पुकारणार आहेत. यामध्ये ऑटो रिक्षाचालकांनी 3 रुपये दरवाढीची मागणी केली आहे. सध्या रिक्षाचे भाडे 21 रुपये आहे.
दरम्यान टाईम्स वृत्तसमुहाशी टॅक्सी युनियनचे नेते एएल क्वाड्रोस म्हणाले, “भाडे वाढवण्याची खूप गरज आहे. कारण, 2021 मध्ये शेवटच्या भाडे सुधारणानंतर सीएनजीचा दर 48 रुपयांवरून 80 रुपयांपर्यंत वाढला आहे. सरकारला शिफारस करण्यात आली होती की मागील भाडे सुधारणेनंतर सीएनजी 25% पेक्षा जास्त वाढल्यास, टॅक्सीचे भाडे त्वरित सुधारित केले जावे, असे म्हणून त्यांनी भाडेवाढीचे कारण यावेळी स्पष्ट केले.
क्वाड्रोस पुढे म्हणाले, मुंबईत टॅक्सीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, अशातच वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहन चालकांना रोज 300 रुपयांचं फटका सहन करावा लागतो. बऱ्याचदा वाहतूक पोलिसही अनेकदा कारवाई करून पैसे उकळतात. त्यामुळे भाड्यामध्ये वाढ झाल्यास आर्थिक बाजू स्थिर होईल,असे म्हणून टॅक्सी युनियन त्यांच्या मागणीवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा…
VIDEO : नारायण राणेंकडून उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा ‘पोस्टमार्टम’
VIDEO : ग्रीन झोन तयार करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तृतीयपंथी समाजाचा चेन्नईत स्तुत्य उपक्रम