टीम लय भारी
मुंबई : नव्या सरकारच्या येण्याने पर्यावरणवाद्यांची ‘आरे’बाबतची भीती आता खरी ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरेतील मेट्रो कारशेड कामावरील बंदी उठवली असून कारशेडचे काम आरेमध्ये पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक, पर्यावरणप्रेमी यांच्याकडून दर रविवारी करण्यात येणारे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार असताना आरेला जंगल घोषित करण्यात आले आणि तेथील कारशेडला बंदी घालण्यात आली आणि सदर मार्ग कांजुरमार्गला हलवण्याबाबत प्रयत्न सुरू करण्यात आले होते. परंतु या निर्णयाला नव्या शिंदे – फडणवीस सरकारकडून हरताळ फासण्यात आले असून शिंदे सरकारकडून हा निर्णयच बदलत आरेमधील कारशेडबाबत वेगळी भूमिका घेतली आहे.
मुंबईतील आरे मध्ये कारशेड नको म्हणून आतापर्यंत पर्यावरणप्रेमींकडून अनेक आंदोलने करण्यात आली. आरे ऐवजी इतरत्र हे कारशेड हालवावे असा मुद्दा सातत्याने पुढे येत राहिला, तर आरे म्हणजे बिबट्यांचा अधिवास असून तेथे खूप जैवविविधता असल्याचे पर्यावरणवादी संघटनांकडून सांगण्यात आले, तर आरेतील कारशेडच्या बांधकामामुळे हे जैवविविधताच नष्ट होईल अशी भीती सुद्धा वारंवार व्यक्त करण्यात आली.
देवेंद्र फडणवीसांचे सरकार होते तेव्हा 2019 साली आरेमध्ये कारशेडचे काम सुरू करण्यासाठी संध्याकाळी वृक्षतोड करण्यात आली त्यावेळी स्थानिक आदिवासींसह अनेक पर्यावरण प्रेमींनी निषेध दर्शवत रात्रभर आंदोलन केले होते. यावेळी अनेकांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले होते.
दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार आले आणि या प्रश्नावर दिलासा मिळाला आणि सरकारकडून आरे ऐवजी अन्य ठिकाण शोधणे सुरू झाले आणि त्यावेळी कांजुरमार्ग हा पर्याय समोर आला. परंतु पुन्हा शिंदे – फडणवीस सरकार आले आणि आरेमध्ये कारशेड बांधण्याच्या निर्णयाला त्यांनी हिरवा कंदीलच दाखवला, त्यामुळे या संपुर्ण प्रकणात आता पर्यावरणप्रेमी आरेचा मुद्दा ठामपणे मांडण्यासाठी आणखी तीव्र आंदोलन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा…
शिवसेनेचा आणखी एक खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता