मुंबई महापालिकेने शनिवारी मागील ५० वर्षांतील सर्वाधिक म्हणजेच ५२,६१९ कोटींचा अर्थसंकलप सादर केला. यामध्ये मुंबईच्या पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने म्हंटले आहे. मात्र, हे बजेट सर्वसामान्य मुंबईकरांच्या हिताचे नसून कंत्राटदारांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आले आहे, असा हल्लाबोल आम आदमी पक्षाने (आप) केला आहे. (This is not the budget of ‘Aam Aadmi’, but of the municipal contractor) अर्थसंकल्पातील भांडवली खर्चासाठी असलेली ६० टक्क्यांहून अधिक रक्कम वापरात नाही तसेच महापालिकेचे बहुतांश विकास प्रकल्प हे अत्यंत संथगतीने सुरु आहेत, असा आरोप ‘आप’च्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी केला आहे. हा अर्थसंकल्प कंत्राटदारधार्जिणा असून यामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्राधान्यक्रम लक्षातच घेतले नाहीत, असे ‘आप’ने म्हंटले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्याच्या सुविधांसाठी ९ टक्के कपात करण्यात आली असून ती रक्कम ६,३०९ कोटींवर आणली आहे. अर्थसंकलपच्या केवळ १२ टक्के इतक्या रकमेची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठीही या बजेटमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. ‘बेस्ट’साठी ८०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पापेक्षा तब्बल ४२ टक्क्यांनी घट महापालिकेने केली आहे. आधीच मरणासन्न अवस्थेत असलेल्या ‘बेस्ट’सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पद्धतशीरपणे रक्तबंबाळ करण्याचा महापालकेचा हा डाव आहे. शिक्षणावरील खर्चातही कपात करण्यात आली असून त्यासाठी केवळ ३,३४७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम अर्थव्यवस्थेच्या एकूण आकारमानाच्या ६.३६ टक्के इतकी आहे, असे प्रीती शर्मा यांनी म्हंटले आहे.