मुंबईत जमावबंदी-कर्फ्यु लागू झाल्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे. मात्र अशी कोणतीही जमावबंदी लागू करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिले आहे. जमावबंदीबाबतचे वृत्त खोटे असल्याची माहिती मुंबईचे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. जमावबंदी लागू केल्याबाबतची अफवा पसरवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
नांगरे पाटील यांनी याबाबत मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर ट्वीट करुन माहिती दिली. नांगरे पाटील म्हणाले, “मुंबई शहरात मुंबई पोलिसांकडून कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आल्याची बातमी आहे. ही बातमी अत्यंत चुकीची आणि गैरसमज व संभ्रम निर्माण करणारी आहे. ज्या व्यक्ती बेकायदेशीर मोर्चे काढतात, निदर्शने करतात, कायदा सुव्यवस्थेस बाधा निर्माण करतात, त्यांच्या विरोधात हा आदेश दर १५ दिवसांनंतर काढण्यात येतो. वर्षातल्या ३६५ दिवसांपैकी ३४१ दिवस हे आदेश जारी केलेले असतात. या आदेशांचा लोकांच्या सर्वसामान्य जीवनाशी अजिबात संबंध नसतो. या आदेशामधून यापूर्वीच कौटुंबीक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम वगळण्यात आले आहेत. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण करून घेऊ नये”, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
सी.आर.पी.सी ११४ वर स्पष्टीकरण
मुंबईमध्ये कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू झाल्याविषयी काही अफवा समाजमाध्यमांवर पसरविल्या जात आहेत
सह पोलीस आयुक्त (का.व सु.) @vishwasnp यांनी या दर १५ दिवसांनी लागू करण्यात येणाऱ्या जमावबंदीविषयी माहिती दिली,तसेच अफवा न पसरवण्याचे आवाहन केले pic.twitter.com/dhbCZ9HWHr— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) December 3, 2022
मुंबईमध्ये कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू झाल्याविषयी वृत्त पसरविले गेले आहे. मात्र ते वृत्त चुकीचे व वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असून हे आदेश नियमित कामकाजाचा भाग असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी जमावबंदीच्या बातमीने धास्तावून जाण्याची काही गरज नाही.
बेकायदा मोर्चे काढणे, पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय निदर्शने करणे, अशा विरोधात मुंबई पोलिस सीआरपीसी कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश काढतात. त्यामधून सर्वसामान्य नागरिक, परवानगी घेऊन करण्यात येणारे कार्यक्रम, धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम नेहमी वगळण्यात येतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या आदेशाचा काही त्रास होत नाही. पोलिस प्रशासनाकडून नियमितपणे हे आदेश लागू करण्यात येत असतात. मात्र कोणीतरी खोडसाळपणे हे जमावबंदीचे आदेश सर्वांसाठी लागू करण्यात आल्याचे सोशल मीडियाद्वारे व्हायरल केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व साशंकतेचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मुंबई पोलिसांना पुढे येऊन याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले.
हे सुध्दा वाचा
भारतीय नौदल कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज : व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादुर सिंग
Photo : भाग्यश्री मोटेचा ‘एकदम कडक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ग्लॅमरस फोटोंवर चाहते होतात फिदा
केरळमध्ये आरएसएसच्या 11 कार्यकर्त्यांना जन्मठेप; घरात घुसून केली होती सीपीएम कार्यकर्त्यांची हत्या
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर नतमस्तक होण्यासाठी येतात. आंबेडकर अनुयायी मुंबईत दाखल होण्यास प्रारंभ देखील झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या जमावबंदीबाबतचे वृत्त पसरल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र आता मुंबई पोलिसांच्या सह आयुक्तांनी स्वतः ही बाब अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतीही चिंता करण्याची गरज नसल्याचे सिध्द झाले आहे.