रविवारी (ता. 30 ऑक्टोबर) गुजरातमधील मोरबी येथील झुलता पूल कोसळल्याने (Morbi Bridge Collapse) अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी पोलिसांकडून या पुलाची देखरेखीची जबाबदारी असलेल्या ओरेवा कंपनीवर तसेच नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांकडून एक महत्वपूर्ण माहिती कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहे. या झुलत्या पुलाच्या तारांना गंज लागला होता, या तारांची दुरुस्ती करण्यात आली असती तर हा दुर्दैवी अपघात घडला नसता, अशी माहिती पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आली आहे. तर ओरेवा कंपनीचे व्यवस्थापक दीपक पारेख यांनी ईश्वराची इच्छा असल्याने हा आपुला कोसळला असा अजब दावा केला आहे. या घटनेमध्ये 140 जणांनी आपला जीव गमावला आहे.
मोरबी पूल दुर्घटनेचे तपास अधिकारी जाला यांनी यांबाबतची माहिती कोर्टात देताना सांगितले की, हा पूल तारांच्या आधारे उभा होता. बऱ्याच महिन्यांपासून या पुलाच्या तारांना तेलपाणी म्हणजेच ऑइलिंग किंवा ग्रीसिंग करण्यात आले नव्हते. या पुलाच्या ज्या ठिकाणी तारा तुटल्या, त्यांना गंज लागण्यात आला होता. त्यामुळे या पुलाचे नेमके कोणते दुरुस्तीचे काम करण्यात आले होते ? ते कसे करण्यात आले होते ? याबाबतचे कोणतेच पुरावे अथवा कागदपत्र ठेवण्यात आलेले नाहीत. या पुलाची नुकतीच दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मग या पुलाच्या दुरुस्तीसाठी आणि देखभाल करण्यासाठी जे साहित्य खरेदी करण्यात आले होते त्याची तपासणी अद्यापही करण्यात आलेली नाही. तर या पुलाचे कंत्राट ज्या अभियंत्यांना देण्यात आले होते त्यांच्याकडून पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले नव्हते, अशी माहिती सरकारी वकील एच. एस. पांचाळ यांच्याकडून देण्यात अली आहे.
हे सुद्धा वाचा
Bachhu Kadu : ‘सत्ता गेली चुलीत, आम्हांला त्याची पर्वा नाही!’ बच्चू कडू आक्रमक
Nitin Raut : पोलिसांची दंडेली! माजी मंत्री नितीन राऊत यांना मोठी दुखापत
या अपघाताप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. या नऊ जणांमधील दीपक पारेख, दिनेशभाई महासुखराय दवे, कंत्राटदार प्रकाशभाई लालजीभाई परमार आणि देवांगभाई प्रकाशभाई परमार यांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली आहे.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून तातडीची मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा गुजरात सरकारने केली आहे.