राहूल गांधी (Rahul gandhi) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदी व भाजपवर त्यांनी यथेच्छ तोफा डागल्या. नरेंद्र मोदी यांचा ढोंगी चेहरा, फसलेली धोरणे, देशाची होत असलेली घसरण अशा सगळ्याच मुद्द्यांचा राहूल गांधी यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला. भाजपचे नेते २४ तास खोटे बोलतात. ते घाबरट आहेत. भितीच्या पोटी ते माझ्यावर ईडीसारख्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून आक्रमण करीत आहेत. या आक्रमणाचा मी आनंद लुटतोय. हे आक्रमण मला अंतर्मनापासून खंबीर बनवित आहे. तुम्ही माझ्यावर आणखी आक्रमणे करा, मी आतून आणखी बळकट होईल, अशा शब्दांत राहूल गांधी यांनी नरेंद्र मोगी सरकारला ठणकावले.
हे सुद्धा वाचा
आम्ही सत्तेत होतो तेव्हा स्वायत्त संस्थांच्या कामात आम्ही ढवळाढवळ करत नव्हतो. म्हणून त्यावेळी लोकशाही टिकून राहिली होती. निवडणूक आयोग, तपास यंत्रणा, न्यायालय, प्रसारमाध्यमे अशा सगळ्या यंत्रणांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माणसांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या संस्था भाजपला मदत करतात, असे राहूल गांधी म्हणाले.
लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे मोठे महत्व आहे. परंतु विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही. सगळ्या कायदेशीर संस्था सत्ताधारी पक्षाला मदत करीत आहेत. आमच्या सरकारमध्ये अशा संस्था न्यूट्रल होत्या. आता अशा संस्था भाजपसोबत आहेत.
भाजपव्यतिरिक्त अन्य दुसऱ्या सगळ्या पक्षांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते. तरीही विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात खमकी भूमिका घेत असल्याचे ते म्हणाले.
देशात बेरोजगारी वाढली आहे. महागाई वाढत आहे. पण अर्थमंत्र्यांना हे आकडे दिसत नाहीत का. त्यांना केवळ विरोधी पक्षांच्या विरोधात बोलायला सांगितले आहे का ? कोणत्याही गावात जा. शहरात जा. तुम्हाला महागाई दिसेल. स्टार्टअप इंडिया या योजनेचे फलित काय हे दाखवून द्या, असाही सवाल राहूल गांधी यांनी केला.
कोविड काळात मोदी सरकारने उत्तम कामगिरी केल्याचे आरोग्य मंत्री सांगतात. पण संयुक्त राष्ट्र संघाने भारतात कोरोनामुळे ५० लाख लोकं मेल्याचे जाहीर केले आहे. गुजरात, गंगा नदीतील मृतदेह जनता विसरलेली नाही, याचीही आठवण राहूल गांधी यांनी करून दिली.
देशात सामान्य लोकांचे प्रश्न गंभीर रुप धारण करीत आहेत. पण सरकार खोटं बोलत आहे. भाजपचे नेते २४ तास खोटं बोलत असतात. सतत खोटे बोलल्यामुळे पितळ उघडे पडेल याची त्यांना भिती असते. खोटे बोलून जनतेसोबत त्यांनी वायदे केले. ते वायदे त्यांना पूर्ण करता येत नाहीत. या भितीपोटी ते विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावत असतात. जनतेच्या हितासाठी मी सरकारवर टीका करणार. मी बोलत राहणार. सरकारच्या धमक्यांना मी घाबरणार नाही. माझ्यावर कितीही आक्रमणे करा. तुम्ही जितकी आक्रमणे कराल, तितका मी आतून खंबीर होईल, अशा शब्दांत राहूल गांधी यांनी नरेंद्र मोदींना ठणकावले.
भाजपच्या आक्रमणासोबत मुकाबला करण्याची मी तयारी केलेली आहे. कशासाठी घाबरायचे. जनतेच्या मुद्द्यांवरून मी लढणार. महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावर मी लढणार. सांप्रदायिक सौहार्द टिकून राहावा यासाठी मी लढणार. तुम्ही जेवढी जास्त आक्रमणे कराल तेवढी माझी विचारधारा अधिक बळकट होईल, असेही ते म्हणाले.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझी चौकशी केली. त्या अधिकाऱ्यांना जावून भेटा, म्हणजे नक्की काय चालू आहे ते कळेल, अशीही सूचना राहूल गांधी यांनी पत्रकारांना केली.
भाजपच्या विरोधात कुणालाही बोलू दिले जात नाही. विचारवंत, चित्रपट अभिनेते असे कोणीही भाजपच्या विरोधात बोलायला लागला की, त्याच्या विरोधात सीबीआय, ईडी अशा यंत्रणा कामाला लावल्या जातात. देशातील लोकशाही संपली आहे. लोकशाही ही केवळ आठवण म्हणून आता शिल्लक राहिली आहे.
भाजपची मंडळी गांधी परिवारावर म्हणून आमच्यावर आक्रमणे करतात. कारण आम्ही एका विचारधारेसाठी लढतो. गांधी हा विचार आहे. या विचारासोबत करोडो लोकं जोडली गेली आहेत. हा विचार लोकशाही बळकट करण्यासाठी आहे. धार्मिक सौहार्द जपण्यासाठी हा विचार आहे. या विचाराशी बांधिलकी ठेवून आम्ही वर्षानुवर्षे लढत आहोत. माझ्या कुटुंबातील अनेकजण त्यासाठी जीव गमावून बसले आहेत, असेही गांधी म्हणाले.
संसदेत सुद्धा सदस्यांना बोलू दिले जात नाही. अनेक गंभीर विषयांवर संसदेत चर्चा व्हायला हवी. पण सरकारची चर्चेला सामोरे जाण्याची तयारीच नसल्याचा आरोप गांधी यांनी केला.
हिटलर व नरेंद्र मोदी यांच्यातील साम्यस्थळावरही राहूल गांधी यांनी बोट ठेवले. हिटलरने सुद्धा सगळ्या कायदेशीर संस्था ताब्यात ठेवल्या होत्या. त्या माध्यमातून तो निवडणुका जिंकत होता. सगळ्या संस्था ताब्यात ठेवल्यामुळेच तो या निवडणुका जिंकायचा असे राहूल गांधी म्हणाले.