टीम लय भारी
मुंबई : अनोख्या शिक्षण पद्धतीमुळे अगदी जागतिक पातळीवर नावारूपास आलेले ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले गुरूजी त्यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा चर्चेत आले. चहुबाजूंनी अडचणीत सापडलेले डिसले गुरूजी यांनी अखेर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धाव घेत आपली बाजू मांडली, त्यावर “गुरूजींवर अन्याय होईल असे पाऊल उचलणार नाही”, असे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी डिसले गुरूजींना यावेळी आश्वस्त केले.
आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी यासंदर्भात काल (दि. 17 जुलै) सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, आमदार सुभाष देशमुख, प्रविण दरेकर व गिरीश महाजन आदी सुद्धा उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिसले गुरूजींना आधार देत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारने गौरविलेल्या शिक्षकावर अन्याय होईल असा कोणताच निर्णय घेणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनी दिले.
दरम्यान, डिसले गुरुजी यांनी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून आगळावेगळा शिक्षणात प्रयोग करत जगात महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान मोठे आहे असं असतांना देखील अधिकाऱ्यांकडून नाहक त्रास दिला जात असून त्यामुळे शिक्षणक्षेत्राची मोठी बदनामी होत असल्याचे म्हणत अनिल बोरनारे यांनी यावेळी दुःख व्यक्त केले.
काय आहे हे प्रकरण?
आदर्श शिक्षक म्हणून गौरविल्या गेलेले डिसले गुरूजी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले त्यानंतर लगेचच गुरूजींनी राजीनामा देण्याचे ठरविले, त्यामुळे असे काय घडले म्हणून समाजमाध्यमांतून यावर उलट सूलट चर्चा मात्र रंगू लागली.
साधारण चौतीस महिने कामावर हजर न राहता पगार घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून सर्व पगार सोलापूर जिल्हा प्रशासन वसूल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले गुरुजींबाबत चौकशी करून अहवाल तयार केला आहे. या अहवालाप्रमाणे कारावाई होणार असे निश्चित असतानाच त्याआधी रणजितसिंह डिसले यांनी 7 जुलै रोजी राजीनामा नोटीस दिली आहे.
दरम्यान 8 ऑगस्ट रोजी त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात येणार असून त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे, परंतु कारवाईची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर कायम राहणार आहे.
या संपुर्ण पार्श्वभूमीवर तात्काळ डिसले गुरूजी यांनी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आपली बाजू मांडली. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांच्यावर अन्याय होईल, असं पाऊल राज्य शासन उचलणार नाही असे म्हणून त्यांनी डिसले गुरूजींना आश्वस्त केले.
हे सुद्धा वाचा…
धनंजय मुंडे यांच्या मागणीला मोठे यश; दोन्ही उड्डाणपुलांच्या चौपदरीकरण कामासाठी निधी मंजूर
खासदार राहुल शेवाळेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल