टीम लय भारी
नवी दिल्ली : सोमवारी (दि. १८ जुलै २०२२) एकीकडे देशात राष्ट्रपती पदासाठी मतदान सुरु असताना शिवसेनेच्या आणखी एका नेत्याने सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. शिवसेनेकडून चार वेळा आमदार राहिलेले रामदास कदम यांनी पक्षाला पत्र लिहीत शिवसेना नेते पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. याबाबत खासदार विनायक राऊत यांना विचारण्यात आले असते. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाने आधीच केला होता, असे विनायक राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.
रामदास कदम हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून शिवसेना पक्षात सक्रिय नव्हते. त्यांनी शिवसेनेच्या काही लोकांच्या, नेत्यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना माहिती पुरवण्याचे काम केले. त्यामुळे रामदास कदम यांचे खरे रूप सहा महिन्यांपूर्वीच समोर आले आहे. रामदास कदम यांच्या पक्ष विरोधी कारवाया या आधीच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आल्या होत्या. असे विनायक राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.
रामदास कदम आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यातील वाद हा सर्वांनाच माहित आहे. याआधी सुद्धा रामदास कदम यांनी अनिल परब यांच्याबाबतची माहिती किरीट सोमय्या यांना पुरवल्याची माहिती समोर आली होती. पण आता खुद्द शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीच या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी खुशाल भाजपमध्ये जाऊन घरोबा करावा, असेही विनायक राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.
दरम्यान, रामदास कदम हे गेल्या काही वर्षांपासून पक्षात फारसे सक्रिय दिसून येत नव्हते. त्यामुळे किरीट सोमय्यांचे बोलवते धनी हे रामदास कदम असल्याचे सर्वांकडूनच सांगण्यात येत होते. याबाबतची माहिती सुद्धा गेल्या वर्षी अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई होत असताना समोर आली होती.
कोकणात जाऊन माहितीच्या अधिकारांतर्गत पुरावे गोळा करणे यामध्ये किरीट सोमय्या यांना शिवसेनेतीलच व्यक्ती साथ देत असल्याचे नेहमीच सांगण्यात येत होते. त्यात, अनिल परब विरुद्ध रामदास कदम हे नाट्य देखील सुरु झाले होते. त्यामुळे उघडपणे दिसत नसले तरी रामदास कदम हेच किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्याविरोधातील पुरावे देत होते आणि पक्षाला हळूहळू संपवण्याचे काम करत होते, असे देखील आता बोलले जात आहे.
हे सुद्धा वाचा :