भारत – पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील लढत पाहण्याची संधी क्रिकेटरसिकांना पुन्हा एकदा मिळणार आहे. आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) शुक्रवारी (2 सप्टेंबर) पाकिस्तान आणि हाँगकाँग या दोन संघात आशिया चषकातील लीग फेरीतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानी संघाने हाँगकाँगचा तब्बल 155 धावांनी धुव्वा उडवला आणि सुपर 4 फेरीत आपले स्थान निश्चित केले. यावेळी पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी करताना 193 धावांचा डोंगर रचला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला हाँगकाँगचा संघ अवघ्या 38 धावांत गारद झाला. त्यामुळे पाकिस्तानी संघाला तब्बल १५५ धावांनी विजय मिळाला.
विशेष म्हणजे, या सामन्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान संघाने आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे आता येत्या रविवारी (४ सप्टेंबर) रोजी क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा भारत- पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, एका स्पर्धेत एका आठवड्याच्या अंतरातच पहिल्यांदाच क्रिकेटचाहत्यांना असा दुग्धशर्करा योग चाखायला मिळणार आहे.
हे सुद्धा वाचा
Weed Farming : ऊसाच्या शेतात लपवून ‘गांजा’ फुलवला
दुखापतीमुळे रवींद्र जाडेजाच्या जागी अक्षर पटेलची वर्णी
Uddhav Thackeray : शहाजी पाटलांचा कार्यक्रम ‘ओके’ करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निवडला चुकीचा माणूस !
पाकिस्तान – हॉंगकॉंग सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 193 धावा रचल्या होत्या. यावेळी पाकिस्तानी संघाचा सलामीवीर मोहम्मद रिजवान याने 78 आणि फखर झमान याने 53 धावांची अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानला सामन्यात विशेष स्थानावर पोहोचवले. त्यानंतर गोलंदाजीमध्ये उपकर्णधार शादाब खानने सर्वाधिक 4 तर मोहम्मद नवाजने ३ आणि नसीम शाहने २ बळी घेऊन हाँगकाँग संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले.
या सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यामुळे तो सुपर 4 मध्ये पोहोचला आहे. परिणामी भारत – पाकिस्तान यांच्यात रविवारी पुन्हा लढत होणार आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. भारताने विजय प्राप्त केला तरी हा सामना अटीतटीचा झाला होता. पाकिस्तानी संघाने चिवट झुंज दिली होती. मागील सामन्यात मधल्या फळीतील रवींद्र जाडेजा (३५) व हार्दिक पांड्या (३३) यांनी चांगली खेळी केली होती. त्यांना विराट कोहलीची (३५) उत्तम साथ मिळाली होती.
वास्तविक भारतीय गोलंदाजांनी गेल्या सामन्यात उत्तम कामगिरी केली होती. पाकिस्तानी संघाला १४७ धावांवर रोखले होते. हे माफक आव्हान घेऊन भारतीय संघ मैदानात उतरला. परंतु पाकिस्तानी संघापुढे दिग्गज भारतीय खेळाडूंनी नांगी टाकली होती.
के. एल. राहूलला तर भोपळाही फोडता आला नव्हता. रोहित शर्मा (१२) व सुर्यकुमार यादव (१८) हे दोघेही स्वस्तात परतले होते. या सामन्यात हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी केली. गोलंदाजी व फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात त्याने सर्वोच्च कामगिरी केल्यामुळे भारताची अब्रु वाचली होती.
पाकिस्तानी संघ हा दुबळा राहिलेला नाही. गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा लिलया पराभव केला होता. गेल्या आठवड्यात भारताने त्याची परतफेड केली. पण विजय मिळविताना भारताच्या नाकी नऊ आल्या होत्या.
भारत व पाकिस्तान सामन्यात ज्या संघाचा पराभव होतो, त्या संघाच्या जिव्हारी लागलेले असते. त्यामुळे गेल्या आठवड्यातील पराभव पाकिस्तानी संघाच्या जिव्हारी लागलेला असेल. या पराभवाची परतफेड करण्यासाठी बाबर आझमच्या सेनेने मजबूत तयारी केलेली असेल. त्यामुळे भारताला बेसावध राहून चालणार नाही.