राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे गेल्या आठवड्यात अपघातात जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णालयात (Brich Kandy Hospital) उपचार सुरू असून आज काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जावून भेट घेतली. खरे तर आमदार थोरात यांच्या खांद्याला देखील काही दिवसांपूर्वी दुखापत झाली आहे. मात्र अशा स्थितीत त्यांनी मुंडे यांच्या प्रकृतीची रुग्णालयात जावून विचारपूस केली. (Balasaheb Thorat met Dhananjay Munde in Brich Kandy Hospital)
नुकत्याच नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला इजा झाली होती. सकाळी मॉर्निंग वॉकला ते गेले असताना पडल्यामुळे थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे उपचार घेतले. अद्यापही थोरात यांचा खांदा पूर्ण बरा झालेला नाही. मात्र अशा अवस्थेत देखील गुरूवारी त्यांनी धनंजय मुंडे यांची ब्रिच कॅन्डी रुग्णालयात त्यांची भेट घेतली. तसेच काहीवेळ गप्पा मारत त्यांच्या तब्बेतीची विचारपूस देखील केली.
हे सुद्धा वाचा
धनूभाऊंच्या भेटीला पंकजाताई ब्रिच कॅन्डी रुग्णालयात; आस्थेने केली तब्बेतीची विचारपूस
नोकरीच्या शोधातील तरुणांसाठी ‘गुड न्यूज’
धनंजय मुंडे यांची प्रकृती सध्या ठिक आहे, मात्र सध्या त्यांना आरामाची गरज असल्याने ते अद्याप रुग्णालयात आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील धनंयज मुंडे यांची रुग्णालयात जावून भेट घेतली होती. बुधवारी धनंज मुंडे यांच्या भगिनी आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील रुग्णालयात जावून धनंजय मुंडे यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
हीच महाराष्ट्रची राजकीय संस्कृती!
राजकारणात कोणी कितीही एकमेकांचे विरोधक असले तरी वैयक्तिक संबंध मात्र अत्यंत जिव्हाळ्याने जपण्याची महाराष्ट्राची राजकीय परंपरा राहिली आहे. या परंपरेचे प्रत्यंतर अनेकदा राज्याच्या राजकारणात दिसून आले आहे. राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक देखील वैयक्तिक, कौटुंबिक आणि मैत्रीच्या पातळीवर एकमेकांचे जिव्हाळ्याचे संबंध जपत असतात. सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रोज आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशा काळात धनंजय मुंडे यांची सर्वच पक्षातील नेत्यांनी आस्थेवाईकपणे केलेली विचारपूस पाहता महाराष्ट्राच्या राजकरणातील सभ्यतेचे दर्शन घडवून जाते.