टीम लय भारी
नाशिक : राज्यातील नवं सरकार सत्ताकारणाच्या चौकटीतच अडकून पडल्यामुळे विरोधी पक्षांकडून चौफेर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्यातील विकासकामे, पूरस्थिती या सगळ्याच बाबतीत भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे. यावर विरोधी पक्ष निश्चितपणे आपली भूमिका मांडेल असे म्हणून त्यांनी विकासकामे सुरू राहतील असा विश्वास यावेळी दिला आहे.
माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, अडचणीचा भाग खूप आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आहे, शेती वाहून गेलेली आहे. लोकांची घरेदारे सुद्धा गेली आहेत,तर शंभरापेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत, असे म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारकडून अजूनही ठोस पावलं उचलली जात नसल्याची खंत भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची स्थिती गंभीर बनली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारकडून अजूनही ठोस पावले उचलली जात नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. @ChhaganCBhujbal यांनी व्यक्त केली. pic.twitter.com/ZmDZ4sKxGQ
— NCP (@NCPspeaks) July 25, 2022
शिंदे – फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी छगन भुजबळ म्हणाले, आजच्या दौऱ्याबद्दल टीका करणे योग्य नाही, मात्र इतर वेळेस होणाऱ्या दिल्ली दौऱ्यांबाबत आपण निश्चित बोलू शकतो. राज्यातील सद्यस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ राज्याला द्यायला हवा असे म्हणून भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदेंना सणसणीत टोला लगावला आहे.
विकासकामांच्या स्थितीवर सुद्धा त्यांनी भाष्य केले आणि आपली नाराजी दर्शवली आहे. विविध विकास कामांबाबत शंका असेल त्यावर स्थगिती आणणे ठीक आहे, मात्र सर्रास विकासकामांवर स्थगिती आणणे योग्य नाही. यावर विरोधी पक्ष निश्चितपणे आपली भूमिका मांडेल, असे म्हणून छगन भुजबळ यांनी बेलगाम कारभारावरून नव्या सरकारला धारेवर धरले आहे.
हे सुद्धा वाचा…
खासदार धैर्यशील मानेंच्या घराला आले छावणीचे स्वरूप
इंधन संपल्याने इंदापुरात कोसळले विमान, महिला वैमानिक जखमी
भांग, गांजा घेतल्यास बलात्कार, खून, दरोडे थांबतील, भाजप नेत्याचा अजब दावा