मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (ता. ३ ऑगस्ट) मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये १० निर्णय घेतले. एकनाथ शिंदे यांनी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना घेतलेला महानगरपालिकांच्या सदस्य वाढीचा निर्णय आता मागे घेतला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकांच्या सदस्य संख्या आगामी निवडणुकीत २२७ वरून २३६ वर जाणार होत्या. त्या आता पुन्हा २२७ चं राहणार आहेत. यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. म्हणून आता मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुका या २०१७ सालच्या प्रभाग रचनेनुसारच होणार आहेत. यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी त्यांच्या ट्विटरला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सदस्य संख्या ही २३६ नाही तर २२७ च राहणार असल्याचा निर्णय घेतला. जेव्हा की, हा निर्णय महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घेतला होता.
हे सुद्धा वाचा
Eknath Shinde Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराची लगीनघाई सुरू
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी केल्या ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या
महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री होते आणि महानगरपालिका सदस्य वाढीचा निर्णय हा याच खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने महाविकास आघाडीला अनुकूल असल्याप्रमाणे प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. पण आता हा निर्णय स्वतःहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे आमदार मनीषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांनी कोणाच्या दबावात येऊन असा निर्णय घेतला आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी ही पोस्ट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना टॅग केली आहे.
महाराष्ट्राचं दुर्दैव पहा ….
प्रभाग रचना…हि नगरविकास खात्याच्या अखत्यारीतला विषय आहे …. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री …..स्वतः घेतलेलाच निर्णय बदलत आहेत (यांच्याकडेच नगरविकास खाते होते) नक्की निर्णय कोण घेतंय ..?? की फक्त हुकुमावरून.. @AUThackeray @OfficeofUT— Dr.ManishaKayande (@KayandeDr) August 4, 2022
दरम्यान, शिंदे-भाजप सरकारकडून अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. पण त्यांच्याकडून एका महिन्याच्या कालावधीत ७०० पेक्षा अधिक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून कायमच त्यांच्यावर या मुद्द्यामुळे तोफ डागण्यात येत आहे. परंतु आता लवकरच शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची माहिती समोर आली आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगर पालिकेच्या सदस्य संख्येचा घेतलेला निर्णय शिंदे-भाजप सरकारला कितपत फायदेशीर ठरणार आहे, हे मात्र येणारी वेळच सांगणार आहे.