महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल बदनामीकारक वक्तव्याबद्दल आज पुण्यात सर्वधर्मीयांनी कडकडीत बंद पाळला आहे. यावेळी मुकमोर्चाचे देखील आयोजन केले होते. या बंदमध्ये छत्रपती खासदार देखील सहभागी झाले होते. दरम्यान एडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पुण्यातील बंद हा बेकायदा असल्याचा आरोप करत उदयनराजे भोसले यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील नेत्यांची महापुरुषांबद्दलची वाचाळ विधाने वाढली असून राज्यात त्या नेत्यांविरोधात संतापाची लाट पसरली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबबत वादग्रस्त विधाने केली होती. तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय गायकवाड, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केल्यामुळे राज्यात त्यांच्याविरोधात कमालीचे संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात सर्वधर्मीयांनी पुणे बंदचे आवाहन केले होते. यात महाविकास आघाडीचे नेते, अनेक संघटना तसेच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी मुकमोर्चाचे देखील आयोजन केले होते. यावेळी डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते लाल महाल असा मुकमोर्चा देखील काढण्यात आला. या मोर्चामध्ये अनेक संघटना, महाविकास आघाडीतील पक्ष देखील सहभागी झाले होते.
हे सुद्धा वाचा
राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला पोर्नोग्राफी प्रकरणात दिलासा
दीपाली सय्यद चित्रपटनिर्मितीत; ‘संत मारो सेवालाल’च्या पोस्टरचे अनावरण
हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत चालणार; तीन वर्षांनंतर नागपुरात कामकाज!
महाराजांपुढे पक्ष दुय्यम
यावेळी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, गेल्या साडेतीनशे वर्षांत शिवाजीमहाराजांबद्दलचा जनमानसातील आदर कमी झाला नाही. तो वाढतच आहे. महाराजांपुढे पक्ष दुय्यम आहे. सध्या काही तुटपुंजे फुटकळ लोक अनावश्यक विधाने करत असून यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. ज्याप्रमाणे नुपुर शर्मांविरोधात कारवाई केली तशीच कारवाई राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर देखील करायला हवी असे देखील उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.
दरम्यान या मुकमोर्चा आणि बंदबाबत एडव्होकेट गुनरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. सदावर्ते यांनी हा मोर्चा बेकायदेशीर असून बंदच्या नावाखाली मोर्चा काढणे लोकांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे म्हणत, लोकांना वेठीस धरल्याचा देखील आरोप केला आहे. पुण्यातील रिक्षावाले, भाजीवाल्यांचे पोट हातावर आहे. त्यांच्या पोटावर आपण पाय देऊ शकत नाही त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.