शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यात पहिले पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आजचा अधिवेशनाचा चौथा दिवस सुद्धा अनेक महत्त्वपूर्ण चर्चांमुळे वादळी ठरला आहे. सरपंच, नगरसेवक यांची थेट निवडणुक घेण्याबाबतचे विधेयक आज सभागृहात मांडण्यात आले. या विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेत प्रचंड विरोध दर्शवला. यावेळी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी सुद्धा मिश्किल शब्दांत टोला लगावत नाराजी दर्शवली. मी कधी काम सांगितले आणि ते काम एकनाथ शिंदे यांनी कधी नाकारलं आहे असं झालं नाही त्यामुळे या विधेयकावर मुख्यमंत्री शिंदे फेरविचार करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘थेट नगराध्यक्ष’ निवडीचे विधेयक आज सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आला. यावेळी विरोधीगटातील नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त करीत यावर पुन्हा विचार करा असे सत्ताधारी शिंदे – फडणवीस सरकारला सुचवण्यात आले. यावेळी जयंत पाटील यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करीत एकनाथ शिंदे यांनी मी सांगितलेले काम कधी नाकारलं असं झालं नाही असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेवर विश्वास दर्शवला आहे.
हे सुद्धा वाचा…
Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांचा ‘ऐक’ नाथ होऊ नये,धनंजय मुंडेंची कोपरखळी !
Mangal Prabhat Lodha : ‘आता तरी थांबा…’ मंगल प्रभात लोढांच्या उत्तरावर पिकला हशा
MPSC Students : एमपीएससी विद्यार्थ्यांचे सरकारविरोधात अनोखे आंदोलन
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, या विधेयकामुळे नगरपालिकेच्या कामकाजात मोठा गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच नगरपालिका अशा आहेत ज्या ठिकाणी नगराध्यक्ष एका पक्षाचे आणि सदस्यांची बहुसंख्या विरोधी पक्षाची बघायला मिळते यामुळे अनेक निर्णय होत नाही, प्रयत्न करून घेतला तरी त्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही आणि नगरपालिकेचे कामकाज ठप्प होते त्यामुळे अपप्रवृत्ती वाढीस लागते, असे म्हणून हे विधेयक आणल्यास काय होऊ शकते याचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला.
पाटील पुढे म्हणाले, थेट नगराध्यक्ष निवडण्याचा प्रयोग या आधीही राज्यात केला गेला होता मात्र त्याचे अत्यंत वाईट अनुभव राज्यातील विविध भागात आले. त्यामुळे मागच्या सरकारच्या नगरविकास मंत्र्यांनी तो निर्णय चुकीचा ठरवला, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की त्यांनी या विधेयकावर पुन्हा एकदा विचार करावा. या विधेयकाला स्थगिती द्या. आपल्याला समर्थन असणाऱ्या सदस्यांना खाजगीत विचारले तर त्यांचाही या विधेयकाला विरोध असेल. या विधेयकामुळे नगरपालिकेची गती खुंटते, विरोधाभासामुळे निधी परत जातो, असे म्हणून संभाव्य अडचणींबाबतची स्पष्टता जयंत पाटील यांनी यावेळी करून दिली.