केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शाह यांच्या या दौऱ्यादरम्यान मनसे – भाजप युतीची गणिते जुळून येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे या युतीचा नारळ लवकरच फुटणार का अशी उत्सुकती सगळ्यांमध्ये ताणली गेली आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप नेत्यांसोबत जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरे यांच्या निवासस्थानी वारंवार जाणे हे याचेच संकेत म्हणता येतील. महाविकास आघाडीची सत्ता उलथून टाकत शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरीही त्याला आता मनसेची जोड मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
भाजप नेते अमित शाह 5 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असून पहिल्यांदा ते लालबागचा राजा, सिद्धीविनायकाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या निवासस्थानी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने अमित शाह महाराष्ट्रात नेमकी कोणती खेळी खेळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यासाठी प्रत्येक पक्ष जोरदार कामाला लागला आहे. महाविकास आघाडी सरकारने यावेळी एकत्रच राहण्याचा चंग बांधला आहे त्यामुळे निश्चितच भाजपची पंचाईत झाली आहे.
हे सुद्धा वाचा…
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी थोपटले दंड, मोठे आंदोलन उभारण्याची तयारी
Eknath Shinde : एकनाथ शिंदे सत्तेत आले अन् राज्याचे 3 हजार कोटींचे नुकसान झाले !
याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा दौरा भाजपला जोरदार मोर्चेबांधणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या संदर्भात मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहा बैठक घेणार आहेत आणि मिशन मुंबई महापालिकाला सुरूवात करणार आहेत. या मिशनमध्ये मनसे सुद्दा सामील होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागच्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे ही महायुती होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे, असे झाल्यास महाविकास आघाडीपुढे मोठे आव्हान उभे राहिल असे सुद्धा सांगण्यात येत आहे.