पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रगीताचा अवमान केल्या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी तपास करून आपला अहवाल सादर करावे असं निर्देश बुधवारी (दि.29) रोजी शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने दिले आहेत.
सदर अहवाल कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी 28 एप्रिलपर्यंत शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टात सादर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. मात्र विशेष म्हणजे आज सकाळीच मुंबई हायकोर्टाने या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्देश कायम ठेवत ममता बॅनर्जी यांना कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला आहे. राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणात ममता बॅनर्जींना कोणताही दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार देत, आज ममता बॅनर्जी यांची याचिका फेटाळली आहे. या प्रकरणी ममता बॅनर्जीं यांनी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाला हायकोर्टात आव्हान दिल होते.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अनादर केल्याचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीत महानगर दंडाधिकारी शिवडी, मुंबई न्यायालयाने त्यांना बजावलेल्या समन्सच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने आज ममता बॅनर्जी यांची सदर याचिका फेटाळली आहे. ममता बॅनर्जी यांनी याचिकेत मुंबई सत्र न्यायालयचे विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी दिलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल होते. यावर बोलताना तक्रारदार विवेकानंद गुप्ता म्हणाले की, आज सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णयात कुठलीही अनियमितता नाही असे निरीक्षण नोंदवत त्यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.
प्रकरण-काय आहे ?
मुंबईतील कफ परेड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान बॅनर्जी यांनी बसलेल्या स्थितीत राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. सदरचे कृत्य हे राष्ट्रगीताचा अपमान आणि अनादर आहे. आणि 1971 च्या राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. अशी तक्रार भाजपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी कफ परेड पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
परंतु पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी शिवडी , मुंबई येथील महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर तक्रार दाखल केली. महानगर दंडाधिकारी शिवडी, मुंबई यांनी ममता बॅनर्जी यांना 2 मार्च 2022 रोजी शिवडी कोर्टात हजर राहण्याचे समन्स जारी केले होते. मात्र बॅनर्जी यांनी त्यास सत्र न्यायालयासमोर आव्हान दिले. त्यानंतर सत्र न्यायालयाने सदर समन्स बाजूला ठेवल आणि हे प्रकरण नव्याने विचार करण्यासाठी शिवडी दंडाधिकार्यांकडे परत पाठवले. मात्र, आज शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात दाखल तक्रारीवर कफ पर्यंत पोलिसांना सदर प्रकरणात तपास करून आपला अहवाल 28 एप्रिल पर्यंत कोर्टात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हे सुद्धा वाचा
आयुष्यमान भारत योजनेच्या ‘स्कॅन अॅन्ड शेअर’ सेवेमुळे रुग्णालयात रांगेत उभे राहण्याची कटकट मिटली!
मॅगीनंतर आता अंडयावर प्रयोग: वेफर ऑमलेटची रेसिपी पाहून खवय्ये संतापले; सोशल व्हायरल
करुणा मुंडे बीडमध्ये धनंजय मुंडेंना देणार चॅलेंज; शिवशक्ती सेना पक्षाची केली स्थापना