खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांचा मुद्दा आज विधानसभेत प्रचंड गाजला. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. आयोजन करणारा कोण शहाणा आहे ? त्याला दोषी ठरवा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना जयंत पाटील म्हणाले की, या प्रकरणात जी समिती नेमली गेली त्या समितीला तीन महिने झाले तरी अद्याप उत्तर दाखल करता आले नाही त्यामुळे समितीला आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. हा काही इतका जटिल प्रश्न नाही. निष्पाप श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समितीला यात काय आयोजन होते, कोणी आयोजन केले होते याची चौकशी करायची आहे. भर उन्हात साडे सहाशे एकरमध्ये २० लाख लोकांना बोलवणारा, त्यांची कोणतीही सोय करणारा, हा कोण शहाणा आहे की ज्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले. याची चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी हा कार्यक्रम घेतला त्या शहाण्या व्यक्तीला यात दोषी ठरवले पाहिजे. हा प्रश्न राखून ठेवण्याची मागणी करत असताना या समितीला मुदतवाढ न देता 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश द्या आणि हे अधिवेशन संपण्याआधी सभागृहात याबाबत गृहमंत्र्यांनी याबाबत उत्तर द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा 26 एप्रिल 2023 रोजी खारघर येथे पार पडला होता. या सोहळ्यात चेंगराचेंगरी आणि उष्माघातामुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कार्यक्रमानंतर रुग्णालयात जाऊन उपचारासाठी दाखल असलेल्या इतर आजारी व्यक्तींची भेट घेतली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती.
२६ एप्रिल २०२३ रोजी खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात १४ श्री सदस्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूबाबत आज शासनाला प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान जाब विचारला. खरंतर हे उत्तर गृह खात्याने द्यायला हवे होते, मात्र जाणीवपूर्वक सांस्कृतिक विभागावर हे उत्तर… pic.twitter.com/ysceGxDYi4
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 20, 2023
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमात उपस्थितीत होते.
हे सुद्धा वाचा:
बाळासाहेब थोरातांनी दोनच दिवसात पावसाळी अधिवेशन गाजवले