शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन लाँगमार्च काढला आहे. नाशिकच्या दिंडोरीमधून रविवारपासून निघालेल्या मोर्चाने सोमवारी नाशिकमार्गे मुंबईकडे कूच केले. शेतमालाला योग्य भाव मिळावा, अवकाळीने झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई मिळावी त्याचसोबत, वनजमिनींचा हक्क मिळावा यांसह इतरही मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा हा एल्गार पुकारलाय. नाशिकमध्ये एकत्र जमून, नंतर मजल-दरमजल करत हा लाँगमार्च मुंबईत येऊन धडकणार आहे. (Nashik Lal Vadal : Farmers movement in Maharashtra)
शेतमालाला अत्यल्प भाव, वनजमिनींचा प्रश्न, गॅस दरवाढ यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या वतीने दिंडोरी ते मुंबई असा मोचा काढण्यात आला आहे. रविवारपासून निघालेल्या मोर्चाने सोमवारी नाशिकमार्गे मुंबईकडे कूच केले. 23 मार्च रोजी हा मोर्चा विधान भवनावर धडक देणार आहे. माजी आमदार जीवा पांडू गावित, डॉ. डी. एल. कराड, अजित नवले, तानाजी जायभावे आदी नेते मोर्चाचे नेतृत्व करीत आहेत.
या मोर्चात शेतकरी, कष्टकरी वर्गाचा प्रामुख्याने समावेश असून पोलिसांच्या अंदाजानुसार ही संख्या सहा हजारच्या आसपास आह रविवारी नाशिक शहराजवळ म्हसरुळ येथे मोर्चाने पहिला मुक्काम केला. त्यानंतर सोमवारी मोर्चेकऱ्यांनी पुढील वाट धरली. पंचवटीतील निमाणी बस स्थानक परिसरात आले असता अल्प भाव मिळत असल्याने कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, वांगे आदी भाजीपाला रस्त्यावर फेकत संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी गंगाधरण डी. यांनी आंदोलकांची भेट घेत संवाद साधला. पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोर्चेकरी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करण्यावर कायम राहिले.

हे सुद्धा वाचा :
शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार? पाच शेतकरी संघटनांचा संसद भवनावर मोर्चा; जाणून घ्या नेमकं प्रकरण
प्रमुख मागण्या
- वनजमिनींचे प्रश्न सोडवावेत
- कांद्याला उत्पादन खर्चावर
- आधारीत किमान आधारभूत भाव देण्याचे धोरण जाहीर करावे
- कर्जमाफ करुन शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा
- जुनी पेन्शन योजना लागू करावी
- अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांचे मानधन वाढवावे
- इंधन, गॅस सिलिडर दर कमी करावे