राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड यांना विनयभंगाच्या प्रकरणात ठाणे कोर्टाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. ठाणे सत्र न्यायालयाकडून जितेंद्र आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जमीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे कोर्टात जितेंद्र आव्हाड यांच्या वकिलांकडून या प्रकरणी युक्तिवाद करण्यात आला. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केले नसल्याचा महत्वाचा युक्तिवाद जितेंद्र आव्हाड यांच्या वकिलांनी केला. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झालेला असला तरी त्यांना वेळोवेळी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहावे लागणार असल्याचे आदेश ठाणे सत्र न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
रविवारी एका कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप रिदा रशीद नामक महिलेकडून करण्यात आला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर आयपीसी कलम 354 अंतर्गत विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. त्याआधीच जितेंद्र आव्हाड हे विवियाना मॉलमध्ये झालेल्या मारामारी प्रकरणी तुरुंगात जाऊन आले होते. त्यावेळी देखील जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हाणामारी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता.
रविवारी (ता. 13 नोव्हेंबर) ठाण्यातील मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा हा सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना होत होते. याचवेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे जाण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित संंबंधित महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि महिला हे समोरासमोर आले आले. यावेळी आव्हाडांनी त्या महिलेला बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. परंतु आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून ‘काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो’ असे म्हणत ढकलल्याचा आरोप करत रीदा रशीद या महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी गलिच्छ आणि खालच्या पातळीच्या राजकारणामुळे राजीनामा देत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले. पण यानंतर पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची समजूत काढली. तर राष्ट्रवादीच्या पक्षाच्या महिला नेत्यांसहित इतर पक्षाच्या महिला नेत्या देखील जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात उभ्या राहिल्या.
हे सुद्धा वाचा
Jitendra Awhad : ‘राजकारण आम्हीही केलं पण…’ विनयभंगाचा आरोप जितेंद्र आव्हाडांच्या जिव्हारी
Jitendra Awhad : विनयभंग किती खरा किती खोटा, जितेंद्र आव्हाडांनी स्वत:हूनच केला व्हिडीओ जारी
जितेंद्र आव्हाड यांच्यावर भारतीय दंड विधान 354 लागल्यानंतर त्यांनी अटकेची कारवाई टाळण्यासाठी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी अंतरिम आदेश देताना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी ठाणे सत्र न्यायालयात जितेंद्र आव्हाड यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी युक्तिवाद करताना जितेंद्र आव्हाड यांचे वकील म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील महत्वाच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. जितेंद्र आव्हाड हे मविआ मधील एक महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी हे सर्व करण्यात येत आहे. तसेच वकिलांकडून या घटनेसंदर्भातील तीन व्हिडीओ कोर्टात सादर करण्यात आले. ज्यामध्ये आव्हाड हे जाणीवपूर्वक महिलेला हात लावत नसल्याचे वकिलांकडून कोर्टाला पटवून देण्यात आले आहे.