मनसेचा वर्धापनदिन यंदा प्रथमच ठाण्यात साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम आज (ता. ९) होणार असून यासाठी सकाळपासूनच राज ठाकरे हे ठाण्यात हजर असणार आहेत. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रभागांमध्ये विविध उपक्रम राबवत आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शिवसेनेतील बंडखोरी व राज्यातील सत्ताबदलाचे केंद्र असलेल्या ठाणे शहरात शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात विविध कारणांमुळे धुसफुस सुरू आहे. याच धर्तीवर मनसेचे अध्यक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त सभा ठाण्यात घेण्याचे योजिले आहे. (Raj Thackeray)
त्याचप्रमाणे गेल्या तीन महिन्यांत राज यांनी शहरात विविध कार्यक्रमांनिमित्ताने दोन दौरे केले. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन ठाण्यात पहिल्यांदाच साजरा करण्याचा निर्णय घेतला असून आज गडकरी रंगायतनमध्ये सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे. राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करतील. या दरम्यान राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत; तसेच आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज यांच्या जाहीर सभेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #मनसे_वर्धापनदिन pic.twitter.com/VhPL02DeqF
— Raj Thackeray (@RajThackeray) March 9, 2023
ठाण्यात होणाऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसेचे नेते, पदाधिकाऱ्यांकडून ‘संघर्षाची तयारी… पुन्हा एकदा भरारी’ अशा पोस्ट समाजमाध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून प्रसारित केल्या जात होत्या. त्यापाठोपाठ आता सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ असे फलक लावून मनसेने वातावरण निर्मिती केली आहे. वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा :
मोठी बातमी : मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला
मनसे कार्यकर्त्यांमुळे उत्तर भारतीयांना त्रास, पण आता ते दिवस संपले…
VIDEO : राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मराठी माणसांची डोकी फुटतात
संघर्षाची तयारी… पुन्हा एकदा भरारी
मनसेचे नेते अविनाश जाधव व अन्य पदाधिकाऱ्यांकडून ‘संघर्षाची तयारी… पुन्हा एकदा भरारी’ अशा पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जात होत्या. राज यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर अनेक मशिदींवरील भोंगे उतरविले गेले. आता राज सत्ताधारी व विरोधक यांचा कसा समाचार घेतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.