मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्यानंतर या खेळातील गोविंदांना नोकरीत पाच टक्के आरक्षण (Reservation) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयाचे दहीहंडी पथकाने स्वागत केले असले तरी, विरोधकांकडून मात्र शिंदे-भाजप सरकारवर टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या घोषणेवर राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून गोविंदांना पाच टक्के आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. इतकेच नाही तर सुरज चव्हाण यांनी ही पोस्ट भाजपचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांना टॅग केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सर्वांचे मन जपण्याचे काम करत आहेत. त्यांच्याकडून जनतेला खुश करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. सुरुवातीला त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण निर्बंधमुक्त साजरे करता येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. तर दहीहंडीच्या दोन दिवसांपूर्वी दहीहंडीचा समावेश साहसी खेळात केला आणि गोविंदांना पाच टक्के आरक्षण जाहीर केले. ज्यामुळे गोविंदा पथकांमध्ये आनंदीआनंद साजरा केला जाऊ लागला.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक मात्र त्यांच्यावर सडकून टीका करू लागले आहेत. राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी पब्जी, ऑनलाईन रम्मी, ऑनलाईन लुडो खेळणाऱ्यांना सुद्धा नोकरीत आरक्षण लागू करा. @ChDadaPatil असे ट्विट करत टोला लगावला आहे. हे ट्विट त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टॅग केल्याने सुरज चव्हाण यांच्या ट्विटर अकाउंटवर कमेंटचा पाऊस पडत आहे.
पब्जी,ऑनलाईन रम्मी,ऑनलाईन लुडो खेळणाऱ्यांना सुद्धा नोकरीत आरक्षण लागू करा.@ChDadaPatil
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) August 20, 2022
दरम्यान, भविष्यात सरकार उठून कोणालाही आरक्षण देत सुटेल, असेही विरोधकांकडून बोलण्यात येत आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी अभ्यास करून आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करावा, असे मत सुद्धा विरोधकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा
Dahihandi Insurance 2022 : गोविंदांना मुंबई भाजपकडून 10 लाखांचे विमा कवच जाहीर
Shahaji Bapu Patil : एकदम ओके म्हणणाऱ्या शहाजी बापूंच्या मतदारसंघात काहीच ओके नाही
कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देताना त्याला ५% अतिरिक्त आरक्षण दिलेलं नाही, तर ५% आरक्षण लागू असणाऱ्या खेळांच्या यादीत दहीहंडीचा समावेश केलाय. त्यामुळे कोणीही टीका करण्याचं कारण नाही.’ असे मत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून व्यक्त केले होते. त्यालाच विरोधात्मक पद्धतीने उत्तर देत सुरज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.